Magazines are strong if they have quality content, production and professional approach – Professor Anand Devdekar
पहिली सम्यक साहित्यकला संगीती, चिपळूण
चिपळूण (प्रतिनिधी): साहित्य व्यवहारांमध्ये नियतकालिके, अनियतकालिके, पुस्तके , मासिके यांची निर्मिती करणे सोपे असते, मात्र त्यांना वाचकांच्या मनात स्थान निर्माण करणे आणि अविरतपणे ती चालवणे फार कठीण असते. त्याकरिता दर्जेदार साहित्य निर्मिती आणि वितरण व्यवस्थेसह व्यवहार उत्तमपणे सांभाळता आला पाहिजे, असे प्रतिपादन मासिक सद्धम्म पत्रिकेचे संपादक प्राध्यापक आनंद देवडेकर यांनी येथे केले.
सम्यक संवाद तर्फे ६ व ७ मे रोजी पहिल्या सम्यक साहित्य कला संगीतीचे चिपळूण येथील चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समितीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते ‘ नियतकालिके व पुस्तके निर्मितीची प्रक्रिया, छपाई वितरण व आव्हाने ‘ या विषयावरील चर्चासत्रात बोलत होते. त्यांच्या समवेत प्रकाशन संस्थेचे प्रमुख रमाकांत जाधव, सृजन प्रकाशन संस्थेचे प्रमुख विजय जाधव, अस्तित्व नियतकालिकाचे संपादक प्रदीप नाईक उपस्थित होते.
प्राध्यापक देवडेकर पुढे म्हणाले, मासिक सद्धम्म पत्रिकेने वीस वर्षे अविरतपणे आंबेडकरी चळवळीत बौद्ध साहित्य व वाङ्मयाचा प्रचार आणि प्रसार अत्यंत दर्जेदारपणे केला. या पत्रिकेची निर्मिती, त्यातील साहित्य व मांडणी अतिशय उत्तम प्रकारे होती तशाप्रकारे जर रचना सांभाळली तर आपणास यश मिळू शकते . मात्र या सर्व प्रक्रियेत आर्थिक व्यवहार व त्याचे गणित जमणे आवश्यक आहे ते न जमल्यास सारे कोसळून पडते. मला व्यवहार न जमल्यामुळे वीस वर्षानंतर सद्धम्म पत्रिका बंद पडली. त्यामुळे आर्थिक व्यवहार, त्याची गणिते जमणे आवश्यक आहे असे सांगितले .
अस्तित्व नियतकालिकाचे संपादक प्रदीप नाईक यांनी नियतकालिकांच्या आर्थिक बाजू विषयी भूमिका मांडली. नियतकालिके, वृत्तपत्रे, मासिके यांना जाहिरातींची आवश्यकता असते. चांगले जाहिरातदार मिळाले तर मुद्रण खर्च त्यातून भागू शकतो. मात्र चळवळीतील नियतकालिकांना मासिकांना प्रस्थापित कंपन्या, आस्थापने जाहिरातीच देत नाहीत. त्यासाठीचा संघर्ष खूप मोठा आहे. संघर्ष करून सरकारी व निमसरकारी खाजगी क्षेत्रातील कंपन्यांकडून जाहिराती कशा मिळवाव्यात? हे तंत्र शिकले पाहिजे . त्याची वसुली कशी केली पाहिजे ?याचेही तंत्र अवगत केले पाहिजे तरच आपल्याला खर्चाचे गणित जुळू शकते आणि पुस्तके तथा नियतकालिके अविरतपणे काढता येऊ शकतात असे सांगितले.
सृजन प्रकाशनचे प्रमुख विजय जाधव यांनी आपल्या मनोगतात पुस्तके निर्मितीची प्रक्रिया उलगडून सांगितले. अलीकडच्या काळात पुस्तके छापण्याची प्रक्रिया खूप सोपी झाली असली तरी साहित्य व्यवहारात व बाजारात त्याचे वितरण योग्य प्रकारे होण्यासाठी प्रकाशन संस्थेची आणि योग्य संपादनाची आवश्यकता असते. योग्य प्रकारचे संपादन झालेले व उत्कृष्ट निर्मिती मूल्य असलेले पुस्तकच बाजारामध्ये मागितले जाते. उत्कृष्ट साहित्य मूल्य आणि दर्जेदार लेखन त्यासाठी आवश्यक असते. सृजन प्रकाशनाच्या वतीने या सगळ्याचा विचार करूनच पुस्तकांची निर्मिती करीत असल्याचे नमूद केले. नव्या लेखकांना आपल्याकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. तर लेखक आणि प्रकाशक रमाकांत जाधव यांनी प्रकाशन व्यवसाय हा खूप आव्हानात्मक व्यवसाय असल्याचे सांगून कुणीही यावे आणि हा व्यवसाय करावा असे नाही. त्यामुळे पुस्तकांची निर्मिती करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो आपण लिहिलेला मजकूर अनेकदा पुन्हा पुन्हा वाचावा लागतो. त्यातील त्रुटी आपल्याला अवगत होतात. त्या आपण दूर केल्यास आपल्या हाती चांगला मजकूर प्राप्त होऊ शकतो. असे सांगितले . माझ्या प्रकाशन संस्थेच्या वतीने आजवर माझी स्वतःची व इतर अनेक मान्यवर लेखकांची पुस्तके प्रकाशित केल्याचा मला सार्थ अभिमान वाटतो. चळवळीतील नव्या लेखक कलावंतांची पुस्तके प्रकाशित करण्यासाठी माझ्याकडून नेहमीच सहकार्य केले जाईल असे सांगितले. या परिसंवादाचे सूत्रसंचालन सुनील जाधव यांनी केले.