तब्बल ३० वर्षांनी पुन्हा बहरली मैत्री शाळेतील बाकांवरची

मळगाव इंग्लिश स्कूल एसएससी बॅच १९९२ – ९३ चा स्नेहमेळावा अविस्मरणीय

सावंतवाडी । प्रतिनिधी : मळगाव इंग्लिश स्कूल, मळगावमधील दहावी बॅच १९९२-९३ च्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मळगाव रेडकरवाडी येथील ‘नरेंद्र सृष्टी ‘ च्या अत्यंत रमणीय व निसर्गरम्य असलेल्या परिसरात संपन्न झालेल्या या मेळाव्यात उपस्थित माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी सादर केलेले विविध गुणदर्शन कार्यक्रम मनोगते यांमुळे स्नेह मेळाव्याला बहार आली. धमाल मस्ती व मनोरंजनाच्या कार्यक्रमांसह जुन्या आठवणींना उजाळा देत हा स्नेह मेळावा अविस्मरणीय ठरला.

ह्या मेळाव्याचे आयोजन १७ एप्रिल पासून करण्याचा पाया गणेश गाड व्हॉटस् अपद्वारे करण्यांत आला होता. तद्नंतर एक एक करत ७५ माजी विद्यार्थी ह्या गटात सामील झाले. १७ एप्रिल पासून २१ एप्रिल पर्यंत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गटातील सर्व मंडळी झटत होती. कोणी जागेचे नियोजन, कोणी मंडप, कोणी चहा- नाश्ता, जेवणाचे नियोजन अरुण भाईडककर, दयानंद परब, बाप्पा नाटेकर, देवानंद नार्वेकर, सतीश राऊळ, शकुंतला राऊळ, महेश राऊळ यांनी तर सर्वासाठी शाळेचे नाव प्रिंट करुन टी शर्ट आणली.

या मेळाव्यात ग्रुपमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतांमधून आपली ओळख करून देतानाच वर्गातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच सद्यस्थितीत सर्वजण कोणकोणत्या क्षेत्रात कार्यरत आहेत याचाही आढावा घेतला. सर्वांनीच आपलं वाढतं वय विसरून सहकारी मित्रांसोबत धमाल केली. आपापल्या आयुष्यातील व करिअरमधील चढ-उतार यांचे अनुभव कथन करीत सर्वांचीच मने भाऊक अंतःकरणाने मोकळी झाली व पुढील आयुष्यासाठी नवी चेतना प्राप्त झाल्याचा भास झाला. दहावी नंतर आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी व्यवसायांनिमित्त एकमेकांपासून दूर गेलेले हे विद्यार्थी व विद्यार्थिनी तब्बल ३ दशकानंतर या स्नेह मेळाव्यात सर्व एकत्र आले होते, मैत्री सोहळा साजरा करण्यासाठी. मळगाव सहित सोनुर्ली, वेत्ये, निरवडे, न्हावेली, बावळाट या गावांमधील माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सहभाग असलेला हा स्नेहसोहळा उत्तम नियोजनात दिमाखात पार पडला.

प्रथम ही सगळी मित्रमंडळी सकाळी ९ वाजता मळगाव इंग्लिश स्कूल येथे भेटली आणि नंतर १० च्या सुमारास ‘नरेंद्र सृष्टी ‘ इथे गेले.

तद्नंतर दिवंगत सहकारी कै. प्रविण सातार्डेकर, हर्षदा कासकर, सुभाष खडपकर यांना श्रध्दांजली अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पांडुरंग ऊर्फ बाप्पा नाटेकर व शकुंतला राऊळ ह्यांनी केले. त्यानंतर उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. प्रत्येकाने आपला परीचय व मनोगतासोबत दिला. तेव्हा असे दिसून आले की प्रत्येक जण जणू याच दिवसाची आस धरून उराशी बसले होते. त्यानंतर सर्वांच्या जुन्या आठवणींना जणू उधाणच आला होता.

स्नेह मेळावा का केला पाहिजे, तसेच आपल्या आयुष्यात मित्रांची गरज का आहे, शिक्षण तसेच संसार सांभाळताना माणूस स्वतःसाठी जगणे विसरून जातो. अशा स्नेह मेळावा माध्यमातून निदान एक दिवस तरी स्वतःसाठी जगावं, गेल्या -३० वर्षांच्या कालावधीत काय कमावलं आणि काय गमावलं याचा विचार करण्यापेक्षा एका नवीन आयुष्याची सुरुवात आपण यापुढील काळात करूया आणि आपले पुढील आयुष्य कसे सुखमय व आनंदमय करता येईल यासाठी प्रयत्न करू. स्नेह मेळावारूपी औषध आपण वर्षातून एकदा तरी घेऊया आणि आपल्या मैत्रीचे नाते मैत्रीच्या धाग्यांनी पुन्हा एकदा घट्ट बांधूया. जेणेकरून पुढील येणाऱ्या काळात कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यास आपण सर्वजण तयार राहू, असे विचार आपल्या मनोगतात दयानंद परब आणि अरुण भाईडकर यांनी मांडले.

या मेळाव्याला माजी विद्यार्थी अरूण भाईडकर, गणेश गाड, बाप्पा नाटेकर, दयानंद परब, देवानंद नार्वेकर, महेश राऊळ, सतिश राऊळ, प्रशांत लातये, गजानन राऊळ, अनिल राणे, विष्णु पेडणेकर, सुधीर गवस, वासुदेव ठाकूर, शरद जाधव, राजेश तेली, प्रमोद मेस्त्री, रुपाली राऊळ, शकुंतला राऊळ, प्रिया नार्वेकर, सरिता गवंडे, बापू धुरी, संतोष गावकर, विनायक सावंत, आत्माराम राऊळ, धर्मनाथ गोसावी, सुधाकर मेस्त्री, राजन तुळसकर, नंदकिशोर दळवी, मंगल राणे, नीता सोनुर्लीकर ,स्मिता रेडकर, स्मिता गोसावी, कारमिलिन फर्नाडिस, गंधदीपा सातार्डेकर प्रभाकर अमरे आदी उपस्थित होते.

Sindhudurg