ऐन आषाढात खेड तालुका तहानलेला ५२ वाड्यात पाणी टँचाई चे दुर्भिक्ष्य !

जून सुरू झाल्यानंतर टंचाईच्या यादीत ८ गावांची भर

खेड(प्रतिनिधी) आषाढ महिना सुरू होऊन चार दिवस उलटले तरी तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना दोन दिवसाआड

टँकरने पाणीपुरवठा सुरूच आहे. पावसाने दांडी मारल्याने तालुक्यात पाण्याची टंचाई वाढली आहे. जून महिन्यातही उन्हाचा तडाखा कायम असून, त्यामुळे पाण्याचे साठे तळ गाठत आहेत. सध्या ३० गावांतील ५२ वाड्यांना एक शासकीय व दोन खासगी

टँकरद्वारे पाणीपुरवठा करून तहानलेल्या

ग्रामस्थांची तहान भागवली जात आहे.

 

सुकिवली येथील चोरद नदीपात्रातून टंचाईग्रस्त गाव-वाड्यांना एक दिवसाआड पाणीपुरवठा करताना

२४२ फेऱ्या धावत आहेत. तालुक्यात ६ मार्चपासून टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरूवात झाली. पोसरे बुद्रुक सडेवाडी येथे पाण्याचा पहिला टँकर

धावल्यानंतर एकामागोमाग एक टंचाईग्रस्त गाव-वाड्यांची संख्या वाढतच गेली. उपलब्ध जलस्रोत कोरडे पडल्याने टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे एकामागोमाग एक अर्ज दाखल झाले. वाढत्या पाणीटंचाईने कहर केल्याने ग्रामस्थांसह प्रशासनही

मेटाकुटीस आले आहे. त्यातच टँकरच्या कमतरतेमुळे तहानलेल्या वाड्यांना पाणी देताना प्रशासनाला

तारेवरची कसरत होत आहे.

 

सर्वसाधारणपणे जून महिन्यात पावसाला सुरुवात

झाल्यानंतर टँकरग्रस्त गावांची संख्या कमी होत

जाते. यंदा मात्र जून महिना सुरू झाल्यानंतर टंचाईच्या यादीत ८ गावांमधील १४ वाड्यांची भर पडली आहे. दयाळ-भडवळवाडी, गौळवाडी, बुरटेवाडी, धुमाळवाडी, धाडवेवाडी, नांदिवली-

देऊळवाडी, बौद्धवाडी, आष्टी-गुरववाडी,

शिरगाव- इनरकरवाडी, येसरावाडी,

खवटी- शिरवली-दंडवाडी, मंडलिककोंड,

वावे तर्फे नातू ढेबेवाडी, कळंबणी बुद्रुक-दंडवाडी येथेही पाणीटंचाई सुरू झाली आहे. एका शासकीय वाहनाच्या १०१ व खासगी वाहनाच्या १४१ अशा

२४२ फेऱ्या एकदिवसाआड धावत आहेत. टँकरच्या कमतरतेमुळे काही गावांना टँकरची प्रतीक्षाच करावी

लागत असून, जेमतेम मिळणाऱ्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. त्या मुळे निर्माण झालेली पाणी टंचाई मॉन्सून च्या जल धारांनी आटोक्यात येऊ शकते अन्यथा पाणी टँचाई चा दाह आणखी वाढणार आहे