मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच तौक्ते वादळात जनतेला मदत केली

मात्र त्या मदतीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत ठाकरे गट आता राजकारण करत आहे

शिवसेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे यांची टीका

मालवण | प्रतिनिधी : मे २०२१ मध्ये घोंगवलेल्या तौक्ते वादळात मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली मदत ही तत्कालीन बांधकाम तथा विद्यमान मुख्यमंत्री मंत्री एकनाथ शिंदे यांच्याच माध्यमातून उपलब्ध झालेली होती. वादळात नुकसानग्रस्तांना मदत करण्याची शिकवण ही शिवसेनेचीच आहे. मात्र याचा राजकारणासाठी आम्ही कधीही फायदा उठविला नाही. त्यामुळे अन्य कोणीही याचे राजकारण करू नये, अशी आमची माफक इच्छा आहे. एकनाथ शिंदेकडून मदत आणून आमदार वैभव नाईक यांनी स्वत:चा केलेला प्रचार स्वार्थी आहे. अशी टीका शिवसेना कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघ प्रमुख बबन शिंदे यांनी केली आहे.

मालवण येथे पत्रकार परिषदेत बबन शिंदे बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख राजा गावकर, तालुकाप्रमुख महेश राणे, शहरप्रमुख बाळू नाटेकर, उपतालुकाप्रमुख पराग खोत, अरूण तोडणकर, उपशहरप्रमुख गीता नाटेकर, विभाग प्रमुख अल्पेश निकम, शबनम शेख, महिला विभागप्रमुख मयुरी घाडीगावकर, मारुती थोरवंशी, संतोष परब आदी उपस्थित होते.

गेले काही दिवस ठाकरे गटाकडून तोक्ते वादळाचा विषय काढून आपणच जनतेला मदत केली असा दिखावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या माध्यमातून बबन शिंदे यांनी रोखठोक भूमिका मांडली. त्यावेळी तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जनतेला मोठ्या प्रमाणात मदत देण्यात आली. तीच मदत आमदार नाईक यांनी वाटली आणि ठाकरे गट आता त्याच मदतीच्या माध्यमातून जनतेची सहानुभूती मिळवण्याचे काम ठाकरे गट करत आहे. असेही बबन शिंदे यांनी सांगितले.

मालवण तालुक्यात शाळांमध्ये शिक्षक नसल्याने शाळा बंद होणार असल्याचे सांगत आमदार वैभव नाईक यांनी पंचायत समितीच्या आवारात नौटंकी करून आंदोलन केले. तालुक्यात एकही शाळा शिक्षक नसल्याने बंद राहिलेली नाही. यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न करण्यात आले. याची माहिती न घेताच आमदारांनी आंदोलन करून आपले अज्ञान प्रकट केलेले आहे. जर आमदारांना खरोखरच तालुक्यातील शासकीय शाळांबद्दल तळमळ होती, तर मग महाविकास आघाडी शासनाच्या अडीच वर्षात किती शिक्षक त्यांनी शाळांसाठी उपलब्ध करून आणले ? शाळांसाठी कोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्यात? हेही जाहीर करावे. शिक्षक प्रश्नी शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी योग्यच नियोजन केलेले असून भविष्यात शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठीही त्यांचा प्रयत्न आहे. सरकार बदलल्यानंतर आता आमदार शिक्षक नसल्याबाबत टीका करत आहेत, मग अडीच वर्षे सरकार असताना गप्प का होते? असाही सवाल बबन शिंदे यांनी उपस्थित केला.

शासन आपल्या दारी कार्यक्रम सिंधुदुर्गात घेवून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. हजारो ग्रामस्थांना शासकीय योजनांची माहिती मिळालेली आहे. एकाच छताखाली शासकीय योजना मिळाल्याने अनेकांनी त्याचा फायदा घेतला आहे. यामुळे आता शासनाच्या योजनांची माहिती घराघरात पोहचविण्यासाठी शिवसेनेच्यावतीने बुथप्रमुख व शिवदुत यांच्यावतीने काम उभे केले जाणार आहे. मात्र विरोधक शासनावर आणि मंत्र्यांवर टिका करण्यात धन्यता मानत आहेत. मात्र सरकार विकासकामे करून उत्तर देणार आहोत, असेही बबन शिंदे म्हणाले. शासन आपल्या दारी कार्यक्रम हा दिशादर्शक आणि तरूणांना उभारी आणणाराच आहे. यामुळे मुख्यमंत्री यांचे अभिनंदन आणि आम्ही आभार मानत आहोत, असेही बबन शिंदे म्हणाले.

पालिकेसाठी सव्वा दोन कोटी : राजा गावकर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालवण नगरपालिकेसाठी नगरोत्थान योजनेतून सुमारे सव्वा दोन कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यातून शहरातील रखडलेली विकासकामे आणि नविन विकासकामे पूर्ण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री यांनी शहरासाठी आवश्यक असणारा निधी १०० टक्के उपलब्ध करून देणार असल्याचे स्पष्ट केले आहे, असे तालुकाप्रमुख राजा गावकर यांनी स्पष्ट केले. कोळंब ते आडारी आणि देऊळवाडा आडवण अशा नदी पात्रातील गाळ काढण्याचे काम लवकरच करण्यात येणार आहे. तसेच शहरातील रखडलेली भुयारी गटार योजना लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी शासन स्तरावरून खास प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासाठी लवकरच जिल्हाधिकारी यांचीही भेट घेण्यात येणार असल्याचेही तालुकाप्रमुख राजा गावकर यांनी स्पष्ट केले.

सागरी महामार्ग, सीवर्ल्ड व्हावेत : राजा गांवकर

सागरी महामार्ग आणि सिवर्ल्ड हे दोन्ही प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आम्ही आग्रही असून मुख्यमंत्री यांच्याकडे तशाप्रकारे पाठपुरावा सुरू आहे. सीवर्ल्डमुळे हजारो तरुणांना नोकऱ्या मिळणार असून पर्यटनाला नविन दिशा मिळणार आहे. तर सागरी महामार्ग मालवण, देवगड, वेंगुर्ला याचबरोबर इतरही तालुक्यांच्या विकासासाठी महत्वाचा मार्ग ठरणार आहे. सागरी महामार्गाची नोंद राजपत्रात झालेली असून लवकरच यासाठी भुसंपादन प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रयत्न आहेत. यामुळे पर्यटनालाही मोठ्या प्रमाणात संधी मिळणार आहे, असे तालुकाप्रमुख महेश राणे यांनी स्पष्ट केले.