नवी दिल्ली : गेल्या वर्षी श्रीलंकेला (Sri Lanka) ज्या आर्थिक संकटाचा (Economic Crisis) सामना करावा लागला होता तेव्हा भारताने (India) पुढे येऊन श्रीलंकेला मदत केली होती. याच प्रकरणी भारताचे आभार व्यक्त करताना श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धने (Mahinda Yapa Abhaywardene) यांनी भारताचे आभार मानले आहेत.
ते म्हणाले, “भारताने श्रीलंकेला ज्या पद्धतीने मदत केली तशी मदत इतर कोणत्याही देशाने केली नाही.आर्थिक संकटाच्या काळात भारताने आम्हाला वाचवले, अन्यथा आम्हा सर्वांना आणखी एका रक्तपाताला सामोरे जावे लागले असते.”
गेल्या वर्षी श्रीलंकेला गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. या दरम्यान भारताने आपुलकी दाखवत कोलंबोला वेगवेगळ्या माध्यमाद्वारे सुमारे चार अब्ज डॉलर्सची मदत दिली होती.
भारताचे राजदूत आणि जवळचे मित्र
महिंदा यापा अभयवर्धने यांनी श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्त गोपाल बागले (Gopal Baglay), श्रीलंकेचे पर्यटन आणि भूमी मंत्री हरिन फर्नांडो आणि श्रीलंकेच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भारताचे कौतुक केले. बागले यांचा उल्लेख करताना श्रीलंकन संसदेचे अध्यक्ष म्हणाले, “येथे तुमचे (भारतीय) राजदूत आमचे खूप जवळचे मित्र आहेत. आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो आणि त्यांचा आदर करतो.