मुंबई गोवा मार्गावरील कशेडी बोगद्यातील सिंगल लेन गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू

सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण आज करणार पहाणी

रत्नागिरी l विशेष प्रतिनिधी : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या रखडलेल्या कामाचा त्रास रोजच प्रवाशी आणि वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. महामार्गाचे अपुरे काम आणि अनेक ठिकाणी पडलेले खड्डे यांचा सामना करावा लागत असतानाच आता एक सुखद माहिती समोर आली आहे. रायगड रत्नागिरी जोडणारा पोलादपूर येथील कशेडी घाटाला पर्यायी असलेला कशेडी बोगद्यातील एक लेन गणेशोत्सवापर्यंत सुरू करण्यात येईल अशी माहिती नॅशनल हायवे अथोरिटीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. बोगद्यातील सुरक्षेची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. पावसाने जर का अजून दहा ते पंधरा दिवसांची उघडीप या दोन महिन्यात केव्हाही दिल्यास गेली चार वर्ष प्रतीक्षा लागून राहिलेल्या या बोगद्यातील सिंगल लेन गणेशोत्सवापर्यंत सुरू होऊ शकते. मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाताना ही सिंगल वाहतूक लेन या कशेडी बोगद्यातून सुरू करण्यात येणार आहे. तसे झाल्यास कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही आनंदाची बाब असून काही प्रमाणात का होईना त्यांचा प्रवास सुखकर होणार आहे.

 

मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना पोलादपूर तालुक्यातील कशेडी हा अवघड वळणांचा महत्त्वाचा घाट पार करण्यासाठी तब्बल 40 ते 45 मिनिटांचा कालावधी लागतो. या घाटात अनेकदा जीवघेणे अपघातही होतात. मात्र कशेडी बोगद्यातील सिंगल लेन सुरू झाल्यास हा वेळ केवळ दहा मिनिटे पंधरा मिनिटांवर येणार आहे.

 

त्यामूळे कोकण आणि गोव्यात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता आणखी सुखकर होणार आहे. गणेशोत्सवात मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असणारा बोगदा वाहतुकीसाठी सुरु झाल्यास पर्यटकांना चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. बोगद्याच्या आतील रस्त्याचे काँक्रेटीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. बोगद्याला जोडणाऱ्या जोड रस्त्यांचे कामही युद्ध पातळीवर अधिकची यंत्रणा लावून सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे

 

सन 2019 मध्ये कंपनीने या बोगद्याच्या कामाला सुरुवात केली. त्यावेळी डिसेंबर 23 पर्यंत या बोगद्याचे पूर्ण काम करून दोन्ही लेन सुरू करण्याची डेड लाईन प्रशासनाकडून ठेवण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या बोगद्याची दोन वेळा पाहणी केली. त्यानंतर रस्ते वाहतूक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हेलिकॉप्टर मधून या मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील रस्त्याची पाहणी केली होती.

 

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती वळणवळणाच्या घाटातून प्रवास करण्यापेक्षा या बोगद्यातून चाकरमान्यांचा सुखकर प्रवास कोकणात व्हावा यासाठी या बोगद्यातील रस्त्यावरील काँक्रेटीकरण करण्याचे काम सध्या दिवस रात्र सुरू आहे. शुक्रवारी राज्याचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण या ठिकाणी येऊन त्याची पाहणी करणार आहेत. कशेडी घाटाला पर्यायी तयार झालेला बोगदा हा गणेशोत्सवाच्या आधी वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनीही काही दिवसांपूर्वीच एका पत्रकार परिषदेत दिली होती. मात्र त्यानंतरही या बोगद्याच्या परिसरातले काम संथगतीने सुरू होते संबंधित ठेकेदाराला सिमेंटचाही अपुरा पुरवठा होत होता त्यामुळे कशेडी येथील स्थानिक नागरिकांनी याचा व्हिडिओ करून सोशल मीडिया वरती व्हायरल केला होता. मात्र आता या बोगदातील कामाला वेग आला आहे.

 

*अत्याधुनिक बुमर तंत्रज्ञानाचा वापर*

 

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील भोगाव खुर्दपासून काही अंतरावर भुयारी मार्गाच्या दुसऱ्या बाजूचे तर खेड तालुक्यातील कशेडी दरेकरवाडीपर्यंत डोंगराच्या आतून दोन बोगदे खोदण्यात आले आहेत. कशेडी घाटाच्या खालील बाजूस बोगद्याची खोदाई अत्याधुनिक बुमर तंत्र वापरून करण्यात आली आहे. बोगद्याची २० मीटर रुंदी आणि ६.५ मीटर उंची आहे.भोगावे, कातळी व कशेडी या तीन गावांमधून या बोगद्याचा मार्ग जातो.

 

या बोगदयाच्या महत्त्वाच्या कामासाठी एकूण ४४१ कोटींचा खर्च अपेक्षित ठेवण्यात आला आहे. हा बोगदा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तीन पदरी होणार असून, दोन भुयारी मार्ग असतील. नियोजनानुसार ७.२ किलोमीटर लांबीचा आधुनिक दर्जाचा हा पक्का रस्ता बोगद्याच्या कामात प्रस्तावित आहे. बोगद्यात हवा खेळती रहावी यासाठीही वायूविजन भुयार बोगद्याच्या रचनेत समाविष्ट आहे. या बोगद्यात सहा ठिकाणी जोड रस्ते असून, बोगद्यात यू टर्नची व्यवस्था आहे. अपघातग्रस्त वाहनांना बाहेर काढण्याची आपत्कालीन सुविधासुद्धा ठेवण्यात आली आहे.

 

या बोगद्याचे मुळ काम रिलायन्स ठेकेदार कंपनीने घेतले आहे पण प्रिया कंपनीने नेमलेली सिद्धार्थ शिंदे यांची कंपनी सध्या या ठिकाणी युद्ध पातळीवर काम करत आहे. या सगळ्या कामावरती केंद्र सरकारने नियुक्त केलेली आयएलएफ कन्सल्टंट ही कंपनी सध्या या सगळ्या कामावरती सुरुवातीपासून सुपरवायझिंग करत आहे. हे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ही कन्सल्टिंग कंपनी यांच्या समन्वयातून सुपरवायझिंग व तंत्रज्ञान, तांत्रिक मार्गदर्शनाचे काम समन्वयातून सुरू आहे अशी माहिती नॅशनल हायवे अथोरिटी अधिकाऱ्यांनी दिली आहे

 

हा बोगदा एकूण दोन किलोमीटरचा असून या बोगद्याला असलेले रस्ते धरून हा सगळा मार्ग नऊ किलोमीटरचा आहे या बोगद्यामुळे अवजड वाहनांच्या वाहतुकीचा मोठा वेळ वाचणार आहे सध्या अवजड वाहनांना कशेडी घाटातून जवळपास 40 मिनिटांचा प्रवास करावा लागतो तोच प्रवास या बोगदा वाहतुकीतून अवघ्या पंधरा मिनिटात करता येणार आहे

 

फोटो कशेडी बोगदा 1।2