अधिक मास सुरू झाला ! पहा कुठे पाळतात अधिकमास !!

उद्यापासून अधिक मास सुरू होत आहे त्याविषयी

जगाचा व प्रामुख्याने मनुष्यजातीच्या रहाटगाडा व्यवस्थित सुरू राहावा यासाठी प्राचीन काळी कालगणना पद्धत निर्माण करण्यात आली व ही व्यवस्था जागतिक स्तरावर वापरली जाते व आधुनिक युगातही अनेक व्यावहारिक आणि धार्मिक गोष्टी सुद्धा कालगणना पद्धतीचा वापर करूनच केल्या जातात. भारतीय कालगणना पद्धतीमधील एक अनोखा महिना म्हणजे अधिकमास. अधिकमासास धोंड्याचा महिना, मल मास, पुरुषोत्तम मास अथवा संसर्प मास असे सुद्धा म्हणतात.

जागतिक कालगणना पद्धतीत सौरवर्षास प्राधान्य असले तरी भारतीय कालगणना पद्धतीत सौरवर्षासहित चांद्रवर्षासही महत्व आहे. सौरवर्ष म्हणजे पृथ्वीस सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण कार्यास जो कालावधी लागतो तो आणि चांद्रवर्ष म्हणजे चंद्रास पृथ्वीच्या बारा प्रदक्षिणा घालण्यास जो कालावधी लागतो तो व चंद्रास पृथ्वीच्या बारा प्रदक्षिणा घालण्यास एकूण ३५४ दिवस लागतात आणि पृथ्वीस सूर्याची एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास ३६५ दिवस लागतात.

सौरवर्षाचे ३६५ दिवस आणि चांद्रवर्षाचे ३५४ दिवस यांची तुलना केली असता दोन्हींमध्ये ११ दिवसांचा फरक येतो त्यामुळे दोन्ही कालगणना पद्धतींमध्ये जो ११ दिवसांचा फरक निर्माण होतो तो संतुलित करण्यासाठी एका वर्षातील ११ असे तीन वर्षांतील ३३ दिवस एकत्र करून एक वेगळा महिना दर तीन वर्षांनी ग्राह्य धरला जातो त्यास अधिक मास म्हणून ओळखले जाते.

अधिक मास हा दर तीन वर्षांतून एकदा येतो आणि तो प्रामुख्याने चैत्र महिन्यापासून अश्विन महिन्याच्या दरम्यान असतो. कार्तिक, मार्गशीर्ष, पौष आणि माघ हे असे चार महिने आहेत ज्यांमध्ये अधिकमास कधीच येतो नाही. फार क्वचित प्रसंगी फाल्गुन महिन्यात अधिकमास येतो हे आपण पहिले आहे.

सूर्य हा एका वर्षात बारा राशींमध्ये संक्रमण करतो म्हणजे एका महिन्यात तो एका राशीत असतो. सूर्याच्या राशी संक्रमणास संक्रांती म्हणून ओळखले जाते आणि अधिकमासाचे वैशिट्य हे आहे की हा एकच महिना असा आहे ज्यामध्ये सूर्याचे संक्रमण होत नाही अर्थात दोन संक्रांतीमध्ये दोन अमावस्या येतात आणि यामधील कालावधीस अधिकमास म्हटले जाते.

विशेष म्हणजे अधिक मास हा चंद्राधारीत कालगणना पद्धती मानणाऱ्या राज्यात पाळला जातो व सूर्याधारित कालगणना पाळणाऱ्या आसाम, केरळ, ओरिसा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आदी राज्यात अधिक मास पाळला जात नाही. अधिकमासास धार्मिक महत्व असून या काळात करण्यासाठी काही व्रते आपल्या धर्मशास्त्रात देण्यात आली आहेत आणि अनेक जण या कालावधीत उपवास सुद्धा करतात.

अधिक महिन्यात संक्रांत नसल्यामुळे चंद्रसूर्यांच्या गतीत फरक पडतो. यामुळे वातावरणातही बदल होत असतो. याचा आपल्यावर अनिष्ट परिणाम होऊ नये म्हणून काही नियम व व्रते पाळावीत. यामुळे मनुष्याला सुख, शांती, समाधान मिळते, त्यांचे इच्छित मनोरथ पूर्ण होतात, त्यांची प्रगती होते. पुढे काही व्रते व नियम दिले आहेत. त्यातील जे जमतील त्यांचे पालन करावे.

नियम

  • १) रोज एकदाच फलाहार करावा.
  • २) नक्त, भोजन करावे. (दिवसा न जेवता फक्त, रात्री पहिल्या प्रहारात एकदाच जेवावे.)
  • ३) महिनाभर मीठ खाऊ नये.
  • ४) रोज तेलाचा किंवा तुपाचा दिवा देवापुढे सतत तेवता ठेवावा.
  • ५) तेहतीस अनारसे, जावयाला दान द्यावे. (अनरशांऐवजी ३३ बत्तासे, खारका, सुपाऱ्या किंवा फळे दिली तरी चालतात.)
  • ६) रोज गोग्रास देणे.
  • ७) हरिविजय ग्रंथाचे एका महिन्यात पूर्ण पारायण करावे.
  • ८) अधिकमास माहात्म्य पोथी किंवा पुरुषोत्तममास माहात्म्य पोथी यांपैकी एका ग्रंथाचे महिन्यात पूर्ण पारायण करावे.
  • ९)  अधिकमास माहात्म्य या पोथीचे रोज पारायण करावे.