रत्नागिरी : भारतीय तटरक्षक दल रत्नागिरीद्वारे केंद्र शासनाच्या ‘आयुष्मान भव’ या मोहिमेचा एक भाग म्हणून किशोरवयीन विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता पसारविण्याच्या उद्देशाने 09 ऑक्टोबर 2023 रोजी रत्नागिरी शहरातील कोकण नगर भागातील इक्रा इंग्लिश मीडियम स्कूल येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
देशातील प्रत्येक शहरात आणि खेड्यात सर्वव्यापी आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या पुढाकाराने राबवण्यात येणाऱ्या ‘आयुष्मान भव’ या मोहिमेच्या प्रसार आणि प्रचाराचा एक भाग म्हणून भारतीय तटरक्षक दल रत्नागिरीद्वारे हे आरोग्य शिविर आयोजित करण्यात आले होते.
वैद्यकीय अधिकारी सर्जन लेफ्टनंट कमांडर संगमेश आणि सर्जन लेफ्टनंट गोपन जीजे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय तटरक्षक दल रत्नागिरीच्या वैद्यकीय पथकाने दिनांक 09 ऑक्टोबर 2023 रोजी इक्रा इंग्लिश मीडियम स्कूल मधील किशोरवयीन वयोगटातील विद्यार्थ्यांची सामान्य आरोग्य तपासणी, वर्गीकरण, व्याधीचे जलद निदान व उपचार आणि आरोग्य व्याख्यान या विषयांच्या अनुषंगाने आरोग्य शिबीर आयोजित केले होते. यावेळी विद्यार्थ्यांतर्फे तटरक्षक दलाच्या वैद्यकीय पथकाचे स्वागत करण्यात आले त्यानंतर शाळेचे अध्यक्ष श्री इलीयास अमीर बगदादी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्याख्यानामध्ये किशोरवयीन वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी मासिक पाळी आणि वैयक्तिक स्वच्छता या विषयावर विशेष भर देण्यात आला. तसेच अवयवदान मोहिमेला प्रोत्साहन देत विद्यार्थ्यांना अवयवदानाच्या महत्त्व अधोरेखित करण्यात आले. सर्व उपस्थितांद्वारे अवयवदानाची शपथ घेण्यात आली. शिबिरात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि या उपक्रमाचे मुख्याध्यापक श्री अरुण जाधव व विद्यार्थ्यांनी चांगलेच कौतुक केले. शाळेतर्फे कुमारी सानिया मुकादम या शिक्षिकेद्वारा या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. या उदात्त कार्यासाठी विद्यालय प्रशासनातर्फे भारतीय तटरक्षक दल रत्नागिरीच्या वैद्यकीय पथकाचे आभार मानण्यात आले.
भारतीय तटरक्षक दल हे आपली सागराची आणि किनारी भागांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या जबाबदारी बरोबरच नागरिकांप्रती आपली बांधिलकी दृढ करणारे विविध समाजोपयोगी आणि सर्वसमावेशक उपक्रम नेहमीच राबवत असतो. केंद्र शासनाची एक सशस्त्र सेना म्हणून म्हणून भारतीय तटरक्षक दल आपल्या नागरिकांबरोबर संवाद साधण्याची आणि त्यांच्यांत जागरूकता पसरवण्याची कोणतीही संधी सोडत नाही. नुकतेच ‘आयुष्मान भव’ या मोहिमेच्या प्रसार आणि प्रचाराचा एक भाग म्हणून तटरक्षक दलाने रत्नागिरी नगर राजभाषा समन्वय समितिच्या सहकार्याने दिनांक 04 ऑक्टोबर 2023 रोजी रत्नागिरी विमानतळ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.