जिल्ह्यातील रिक्षा चालकांच्या समस्यांविरोधात उद्या जन आंदोलन

रत्नागिरी:- रत्नागिरीतील रिक्षा चालकांच्या समस्यांविरोधात लवकरच जन आंदोलन करण्यात येणार आहे.आणि त्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत आयोजकांकडून ‘राजकारण विरहित रिक्षा चालकांच्या हितासाठी एकत्रित लढा उभारुया आणि रिक्षाचालकांना समृद्ध बनवूया’ असे आवाहन करण्यात आले आहे.त्याबरोबर सर्व रिक्षा चालकांना कळविण्यात येते की संपूर्ण महाराष्ट्रासह रत्नागिरी, रायगड, जिल्ह्यांमधे येणाऱ्या काळात मुक्त रिक्षा परवाना वाटपासह दुचाकी टॅक्सी परवाना तसेच ई रिक्षा विना परमिट देण्याचे धोरण सरकारने अवलंबले आहे. तसेच शासनाने बदललेल्या धोरणामुळे रिक्षा व्यावसायिकांना व्यवसाय करणे अडचणीचे झाले आहे. तसेच आपल्या कुटुंबाच्या उपजिविकेसह मुलांचे शिक्षण वैद्यकीय खर्च व इतर खर्च करते वेळी शासनाच्या मुक्त परवाना धोरणामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. मराठवाडा विदर्भासह महाराष्ट्राच्या काही भागात रिक्षा व्यावसाय ठप्प झाल्याने कर्जबाजारी होवून काही रिक्षाचालकांनी आत्महत्येचा पर्याय निवडला आहे. यामधे काही रिक्षाचालक मृत्युमुखी देखील पडले आहेत. परिवहन विभाग व पोलिस प्रशासन यांच्यामुळे रिक्षाचालकांना व्यवसाय करणे कठीण होत चालले आहे.

तरी आपण या जुलूमशाही विरोधात जन आंदोलन करुन आपल्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी दिनांक २८/१०/२०२३ रोजी ठीक १०:३० रत्नागिरीत आयोजित चर्चा सत्रात जिल्ह्यातील विविध भागातील रिक्षाचालकांनी भाग घेवून आपले विचार व समस्या मांडाव्यात. या प्रसंगी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी रिक्षा चालक मालक कृती समिती पुणेचे सरचिटणीस नितीन पवार यांच्यासह रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्षा चालकाचे प्रतिनिधि उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी या प्रसंगी संपूर्ण जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, देवरुख, संगमेश्वर, लांजा, राजापूर सह रत्नागिरीतील रिक्षाचालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे. दिनांक २८/१०/२०२३,सकाळी १०:३० दत्त मंगल कार्यालय येथे ही बैठक होणार आहे.अधिक माहितीसाठी प्रताप भाटकर-९७६५३९८९९८ यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.