Mumbai Pollution : मुंबईतील प्रदूषणाला आदित्य ठाकरेच जबाबदार!

आपलीच पाठ आणि आपलंच खाजवणार्‍यांनी मुंबईला काय करुन दाखवलं?

भाजप आमदार आशिष शेलार यांचा आरोप

मुंबई : मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांत प्रदूषणाचे (Mumbai Pollution) प्रमाण प्रचंड वाढले असून हवेची गुणवत्ता (Air Quality) फारच खालावली आहे. मुंबईमध्ये सुरु असलेले अनेक बांधकामांचे प्रकल्प, वाहनांच्या संख्येत झालेली वाढ यांमुळे मुंबईकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी थेट उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) पर्यावरण मंत्री असताना त्यांनी मंजूर केलेल्या प्रकल्पांमुळेच मुंबईकरांना हे दिवस पाहावे लागत आहेत, अशी जळजळीत टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

आशिष शेलार म्हणाले, मुंबईमध्ये हवेची गुणवत्ता ढासळत चालली आहे, प्रदूषण वाढत चाललं आहे. आज मुंबईकर जो त्रास आणि यातना भोगतो आहे, त्याला सर्वस्वी जबाबदार तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांना मी धन्यवाद देईन की त्यांनी आज या विषयावर स्वतः काही पावलं उचलली. पण विषय असा आहे की, आरेला जंगल घोषित केलं म्हणून आपलीच पाठ आणि आपलंच खाजवणारे किंवा वाजवणारे यांनी मुंबईला काय करुन दाखवलं? असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला.

पुढे ते म्हणाले, प्रत्यक्षात आदित्यजी तुम्ही काय केलं? दहा वर्षांमध्ये मुंबईतील ३० ते ३८ हजारांच्या वर झाडं तोडण्याची परवानगी तुम्ही दिली. कोविडच्या काळात व्यावसायिकांना, बिल्डर्सना प्रीमियम भरण्यात ५० टक्के सूट देण्यात आली. या ५० टक्के माफीमुळे सर्व बिल्डर्सनी पटापट अॅग्रीमेंट करुन, परवानग्या, प्लॅन अप्रूव्हल करुन घेतले. दरवर्षी मंजूर होणार्‍या प्लॅन वा आराखड्यांपेक्षा दुप्पट आणि तिपटीने आराखडे मंजूर झाले. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून प्रत्यक्षात तिप्पट बांधकामाला सुरुवात झाली, असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.