रत्नागिरी | प्रतिनिधी : स्त्री सतत आपल्या कुटुंबासाठी झटत असते. स्वतःच्या इच्छा, स्वप्न बाजूला ठेवून ती आपल्या कुटुंबाच्या नेहमी तत्पर असते. अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून तिला समाजामध्ये वावरण्याची संधी मिळतेच मात्र विचारांची देवाणघेवाण होवून उत्साह निर्माण होतो,असे प्रतिपादन पोमेंडी बु.च्या सरपंच सौ.ममता जोशी यांनी केले. त्या ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन महिला आघाडी रत्नागिरीच्या वतीने कुवारबाव येथील हळदी कुंकू कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होत्या.यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ उषा पारशे, उपाध्यक्ष सुनंदा फुकट, ऑफ्रोह, रत्नागिरीच्या उपाध्यक्ष नंदा राणे, सचिव सुनंदा देशमुख सहसचिव स्वाती रोडे हे उपस्थित होते.
महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष उषाताई पारशे यांनीही आपल्या कर्मचाऱ्यांवरील अन्यायाविरूद्ध आपण ऑफ्रोह संघटनेच्या माध्यमातून एकत्र आलो व अशाच विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सतत एकत्र येत राहिले पाहिजे,असे मत व्यक्त केले.ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन महिला आघाडी च्या सभासद प्रतिभा रोडे , राजकन्या भांडे, गोकुळा धनी, यांच्या सह शिलाताई देशमुख,वनमाला भगत, वंदना चेचरे, प्रमिला घावट, सुनिता टापरे इत्यादी महिला मंडळी उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनंदा देशमुख यांनी केले. उपाध्यक्ष सुनंदा फुकट यांनी आभार मानले.