बाबासाहेबांचे विचार प्रामाणिकपणे अंमलात आणल्यास यशाकडे नक्कीच वाटचाल : अंकुश जाधव

If Babasaheb’s ideas are implemented sincerely, there will definitely be progress towards success: Ankush Jadhav

पणजी । प्रतिनिधी : आपले आचार विचार वेगवेगळे असले तरी संविधानाने आपल्याला एकसंघ ठेवले आहे. पण संविधानाचा प्रसार आणि प्रचार जनसामान्यांपर्यंत जसा व्हायला हवा तसा दुर्दैवाने झालेला नाही. जसं आपण हक्कासाठी आणि अधिकारासाठी भांडतो तशीच आपण आपली कर्तव्य सुद्धा निभावली पाहिजे. ज्या दिवशी आपण बाबासाहेबांच्या विचाराने आणि संविधानाने दिलेले अधिकार आणि कर्तव्य प्रामाणिकपणे अमलात आणू तो दिवस खऱ्या अर्थाने आपल्याला महासत्तेकडे घेऊन जाणारा असाच असेल, असे मत सिंधुदुर्ग जि.प.चे माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी व्यक्त केले.

भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र पणजी आणि युथ होस्टेलच्या संयुक्त विद्यमाने पणजी गोवा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंती कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती तथा भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष अंकुश जाधव यांनाविशेष निमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी विचार मंचावर प्रशासकीय अधिकारी तथा युथ हॉस्टेलचे व्यवस्थापक के के घाटवळ, सामाजिक कार्यकर्त्या आणि प्रसिद्ध वकील हर्षदा नाईक, गोवा मडगाव जिल्ह्याच्या समाज कल्याण अधिकारी सुप्रिया मांजरेकर, व अन्य मान्यवर उपस्थित होते

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी केलेले महान कार्य आणि संविधान यामुळे देश आज एकसंघ आहे त्यांनी आपल्या जीवनात खूप मोठा संघर्षाचा लढा उभा केला शोषित,वंचित,पीडित कष्टकरी,कामकरी,शेतकरी महिला, दलित,वंचित या सगळ्यांसाठीच मोठं काम केलेलं आहे. त्यामुळेच आज या सर्वांची प्रगती झाली आहे. यासाठी त्यांचे हे उपकार आपल्याला विसरून चालता येणार नाही. त्यांचे प्रेरणादायी विचार आपण सगळ्यांनी पुढे घेऊन गेले पाहिजेत. त्यांच्या विचारांची आज देशाला खऱ्या अर्थाने गरज आहे तरच आपण महासत्तेकडे वाटचाल करू शकतो, बोलताना स्पष्ट केले.

यावेळी के के घाटवळ यांनी माजी सभापती अंकुश जाधव यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांचे कौतुकही केले. ते म्हणाले, अंकुश जाधव यांनी खुप मोठा संघर्ष केला. काही वर्षापूर्वी हा अंकुश नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग मध्ये एक स्वयंसेवक म्हणून दाखल झाला होता. त्यांनी पत्रकार म्हणूनही काही वर्षे यशस्वी काम केले.या व्यासपीठाने अनेक तरुण घडविले त्यापैकीच एक जाधव आहे. त्याने केलेला परिस्थितीशी संघर्ष आणि त्यातून जिल्ह्याला मिळाला एक लोकप्रतिनिधी समाजाला दिशा देणार नेतृत्व म्हणून आज त्यांची ओळख सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. हे त्यांना अगदी सहज मिळाले नाही यासाठी त्यांना खूप मेहनत,जिद्द आणि मोठा संघर्ष करावा लागला आहे. म्हणूनच आजच्या पवित्र दिवशी बाबासाहेबांच्या जयंती उभे राहिलेले धगधगत सिंधुदुर्गाचे नेतृत्व गोव्यातील तरुणाईला अभ्यासता याव आणि जवळून पाहता यावं म्हणून त्यांना आज प्रमुख पाहुणे म्हणून येथे मी विशेष निमंत्रित केले आहे.अशा शब्दात अंकुश जाधव यांचा घाटवळ यांनी कौतुक आणि गौरव केला. यावेळी ॲड. नाईक व अन्य मान्यवर यांनी विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन आणि आभार कात्यायनी घाटोळे यांनी केले