भाजपच्या महाविजय अभियानाचा १९ रोजी सावंतवाडीत भव्य सभेने समारोप : राजन तेली

रविंद्र चव्हाण, निलेश राणे व चित्रा वाघ राहणार उपस्थित

सावंतवाडी । प्रतिनिधी : भारतीय जनता पाटीच्या माध्यमातून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या ‘महाविजय अभियाना ‘ची सांगता १९ एप्रिल ला सायंकाळी सहा वाजता येथील गांधी चौकात सभेच्या माध्यमातून होणार आहे. या सभेला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे तसेच महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ उपस्थित राहणार असून ही सभा भव्य दिव्य होईल, अशी माहीती जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली.दरम्यान, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपल्या खात्यामार्फत जिल्ह्यात उपलब्ध करून दिलेला कोट्यावधी रुपयांचा निधी लक्षात घेता त्यांचा भव्य सत्कार यावेळी करण्यात येणार असल्याचेही राजन तेली यांनी स्पष्ट केले.

सावंतवाडीतील भाजपा संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराधक्ष संजू परब, भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग, जिल्हा चिटणीस मनोज नाईक, माजी नगरसेवक आनंद नेवगी, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस बंटी पुरोहित, किसान मोर्चा जिल्हा चिटणीस अजय सावंत आदी उपस्थित होते.सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये दोन एप्रिल पासून भाजपाचे महाविजय अभियान सुरू आहे. सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद मतदार संघ निहाय हे अभियान राबविण्यात आले. राज्यातील शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातून अलीकडेच जे बजेट मांडण्यात आले ते बजेट प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे अभियान राबवण्यात आले. शिवाय मतदारसंघातील समस्या तेथील विकास कामासंदर्भातील ग्रामस्थांच्या मागण्याही याद्वारे समजावून घेण्यात आल्या. एकंदरीत या अभियानाला तिन्ही तालुक्यामध्ये भरभरून प्रतिसाद लाभला असल्याचेही तेली म्हणाले.

या पार्श्वभूमीवर या महाविजय अभियानाचा समारोपही भव्य दिव्य अशा स्वरूपात व्हावा यासाठी १९ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता गांधी चौक येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कोलगाव ग्रामपंचायतने नवीनच विकसित केलेल्या ॲपचे लोकार्पणही उपस्थित नेत्यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आगामी निवडणुकांवर पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. जरी राज्यात शिवसेना-भाजप युती असली तरीही जिल्ह्यात भाजपा पक्ष वाढविण्याच्या दृष्टीने शतप्रतिशत स्वबळावर लढण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी सर्वांची मेहनत सुरू आहे. भविष्यात सत्तेच्या माध्यमातून किनारपट्टीला जोडणारे रस्ते विकसित करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. यापलीकडे जनतेला आवश्यक असलेला विकास भाजपाच्या माध्यमातून व राज्यातील सत्तेच्या माध्यमातून आम्ही नक्कीच करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, समारोप कार्यक्रमाला राज्याचे सार्वजनिक मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी जिल्ह्याच्या विकास कामांसाठी उपलब्ध करून दिलेला कोट्यावधी रुपयांचा निधी लक्षात घेता त्यांचा भव्य दिव्य असा सत्कार जिल्हा भाजपच्यावतीने करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

चौकट

तलावा काठचाच बाजार योग्य : संजू परब

सावंतवाडी शहरात सुचवलेल्या चार जागा आठवडा बाजारासाठी योग्य नसतील तर पर्याय म्हणून स्वार हाॅस्पीटल समोरील जागा निवडण्यात येईल असे वक्तव्य शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले होते. याबाबत माजी नगराध्यक्ष संजू परब यांना विचारले असता ते म्हणाले, नागरिकांच्या व व्यापाऱ्यांच्या दृष्टीने मोती तलावा काठचाच बाजार योग्य आहे. हा बाजार जिमखाना येथे नेल्यास तेथे अनेक अडचणी येतील. शिवाय बाजार खरेदीसाठी लांब पल्ल्याचा ठरेल. त्यामूळे आम्ही नागरिकांसोबत असून पालकमंत्र्यांच्या माध्यमातून हा बाजार न हलवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.