“Small the sting, big the risk”…don’t worry…be careful….
२५ एप्रिल जागतिक हिवताप दिन
रत्नागिरी | मनोज शिवाजी सानप : दरवर्षी २५ एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो.या दिवशी जनतेमध्ये कीटकजन्य आजारांबाबत विशेषतः हिवतापाबाबत जनजागृती करण्यात येते.शाळेतील विद्यार्थांचा सहभाग घेउन प्रभात फेरी काढण्यात येते. सर्व आरोग्य संस्थेमार्फत ग्रामीण भागात हिवताप विषयक आरोग्य शिक्षण देण्यात येते.
आज जगातील सुमारे निम्मी लोकसंख्या कीटकजन्य आजारांच्या छायेखाली आहे.रोगकारक जंतूचा प्रसार करणाऱ्या कीटकांमध्ये मुख्यत्वे डासांचा समावेश होत असला तरी डासांसोबतच पिसवा, ढेकूण, गोचिड तसेच सॅन्डफलाय या प्रकारच्या किटकांपासून वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर आजार पसरतात. जगातील जवळपास ९७ देशांमध्ये हिवतापाची समस्या आढळते, आजही दरवर्षी जगभरात हिवतापामुळे सुमारे ६ लाख लोकांचा मृत्यू होतो. एडीस डासामुळे पसरणारा डेंग्यू हा आजारमागील ५० वर्षात जगभरात सुमारे ३० पटीने वाढला आहे.वाढते शहरीकरण, आंतरराष्ट्रीय दळणवळण, वातावरणातील बदल आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे भूजलाचा वाढता वापर यामुळे जगभरात दरवर्षी सुमारे ५ लाख लोकांना डेंग्यू आजारामुळे रुग्णालयात भरती व्हावे लागते यापैकी सुमारे २.५ टक्के लोकांचा या रोगाने मृत्यू होतो. याशिवाय ३० टक्केपेक्षा अधिक मृत्यूदर असणारे जपानी मेंदूज्वर, चंडीपूरा मेंदूज्वर यासारखे आजारही तुरळक स्वरूपात आढळतात.
कीटकजन्य रोगप्रतिबंध व नियंत्रणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना :-
- दैनंदिन सर्वेक्षण-राज्यात गावपातळीवर आरोग्यसेवक आणि सेविका यांच्याव्दारे नियमितत रुग्ण सर्वेक्षण करण्यात येते.
- मान्सून पूर्व उपाययोजना – बहुतेक साथ रोग पावसाळ्यात वाढत असल्याने संपूर्ण राज्यभर जिल्हा तसेच क्षेत्रियस्तरावर मान्सून पूर्व साथरोगप्रतिबंध व नियंत्रण तयारी करण्यात येते. याअंतर्गत स्वच्छता सर्वेक्षण, जोखमीच्या गावांकडे विशेष लक्ष, डासोत्पत्तीस्थानांची नोंद, साथरोग कक्षाची स्थापना आदी आवश्यक उपाययोजना करण्यात येतात.
- जून हिवताप विरोधी महिना-दरवर्षी संपूर्ण राज्यात जून हा हिवताप विरोधी महिना म्हणून साजरा करण्यात येतो. या महिन्यात किटकनाशक आजार प्रतिबंधक विविध उपाययोजना, आरोग्यशिक्षण, लोकसहभाग इत्यादी बाबींवर विशेष भर देण्यात येतो.
- कीटक शास्त्रीय सर्वेक्षण – डासांमुळे पसरणाऱ्या आजारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याकरीता नियमित स्वरुपात किटक शास्त्रीय सर्वेक्षण करण्यात येते.पाण्याचे साठे तपासून त्यामध्ये अळीनाशक द्रावण टाकले जाते, तसेच आवश्यकता भासल्यास पाणी साठे रिकामे करण्यात येतात.
- आवश्यक प्रयोगशाळा सुविधांची उपलब्धता– राज्यात डेंग्यू आणि चिकुनगुनिया आजाराच्या निदानासाठी २३ सेंटीनल प्रयोगशाळा राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहेत. या प्रयोगशाळांमध्ये डेंग्यू / चिकुन गुनियाचे त्वरीत निदान करण्यात येते.
- पुरेसा औषधसाठा आणि योग्य औषधोपचार.
- एकात्मिक कीटक व्यवस्थापन-डास प्रतिबंधासाठी परिसरात किटकनाशक फवारणी, अळीनाशकांचा वापर तसेच जैविक प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये गप्पी माशांचा वापर अशा विविध प्रकारे आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतात..
- शहरी भागात सिव्हिक बायलॉजची अंमलबजावणी – डासोत्पत्ती रोखण्यासाठी लोकसह भागाची अत्यंत
आवश्यकता आहे.सर्व सामान्यांना डासनियंत्रणा मधील आपली जबाबदारी समजण्यासाठी शहरी भागात सिव्हिक बायलॉजची अंमलबजावणी करण्या संदर्भात शासन प्रयत्नशील आहे.
- उद्रेकग्रस्त भागात धूरफवारणी
- कीटकनाशक फवारणी-ए.पी.आय २ टक्के पेक्षा वाढलेल्या सर्व गावांमध्ये कीटकनाशक – फवारणीचे नियमित २ फेऱ्या घेण्यात येतात. पहिली फेरी माहे मे च्या शेवटच्या आठवडयात सुरु करण्यात येते व दुसरी फेरी अडीच महिन्यानंतर म्हणजे माहे ऑगस्टमध्ये सुरु करण्यात येते.
- शहरी भागातील विशेष उपाययोजना-साप्ताहिकअळीनाशकाचा वापर, बांधकाम आणि विकास कामावरील मजूरांचे नियमित सर्वेक्षण.
- आंतरविभागीय समन्वय – सर्व कीटकजन्यरोगांच्या प्रभावी प्रतिबंधनासाठी नगरविकास, ग्रामविकास, पाणीपुरवठा विभाग तसेच शालेय शिक्षण विभागाशी नियमित समन्वय राखला जातो.
- कीटकव्यवस्थापनात ग्रामआरोग्य स्वच्छता व पोषण समितीचा सहभाग– राष्ट्रीय ग्रामीणआरोग्य अभियान अंतर्गत प्रत्येक ग्रामआरोग्य स्वच्छता व पोषणसमितीस मिळणा-या वार्षिक निधीपैकी १५ टक्के निधी कीटकव्यवस्थापनावर खर्च करण्याबाबत सर्व संबंधितांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. लोकसहभागातून परिसर स्वच्छता व आठवडयातून एक कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन.
- आरोग्यशिक्षण-डेंग्यूप्रतिबंध व नियंत्रणासाठी सर्वसामान्य जनतेचे वृत्तपत्र जाहिराती, – रेडिओ जिंगल्सआणि टीव्ही स्पॉट अशा विविध माध्यमातून आवश्यक ते प्रबोधन करण्यात येते.
(लेखक रत्नागिरीचे जिल्हा माहिती अधिकारी आहेत. )