वसई-सावंतवाडी पॅसेंजर ”मधु दंडवते” स्लो एक्सप्रेस नेहमीसाठी सुरू करा

CM एकनाथ शिंदेंकडे प्रवासी संघटनेची मागणी

सावंतवाडी : कोकण रेल्वे मार्गावर वसई-सावंतवाडी पॅसेंजर अर्थात ”मधु दंडवते” स्लो एक्सप्रेस नेहमीसाठी सुरू करण्यात यावी अशी मागणी वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना-मुंबई यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांच नावान ही रेल्वे सुरू करावी अशी प्रमुख मागणी यात करण्यात आली आहे. या मागणीची मुख्यमंत्री म्हणून रेल्वे बोर्डाकडे शिफारस करावी अशी विनंती करण्यात आली आहे.

मुंबई पश्चिम रेल्वेच्या वसई नायगाव नालासोपारा विरार ते डहाणू रोड परिसरात कोकणातील लोकांची (सिंधुदुर्ग रत्नागिरी व रायगड) लोकवस्ती ही साधारण ८ लाखाच्या घरात आहे. भविष्यात ते प्रमाण वाढतही जाईल. मात्र, या विभागातील लोकांना कोकण रेल्वेसाठी दादर किंवा सीएसएमटी स्टेशनला जावे लागते व खूप त्रासही सहन करावा लागतो. कोकण रेल्वे मार्गावर उत्तरेतून दक्षिणेकडे जाणाऱ्या जलदगतीच्या रेल्वेगाड्या बऱ्याच आहेत. मात्र याचा कोकणवासीयांना काहीच फायदा होत नाही. म्हणूनच फक्त कोकणवासीयांसाठी वसई ते सावंतवाडी पर्यंत कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांच्या नावाने ही स्लो पॅसेंजर रेल्वे सुरू करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. संघटनेच्या या मागणीची रेल्वे बोर्डाकडे शिफारस करावी अशी विनंती एकनाथ शिंदे यांना करण्यात आली आहे.

ही मागणी पश्चिम रेल्वे व कोकण रेल्वेकडे मागील पाच वर्षापासून केली जात आहे. वसई हे टर्मिनल नसल्याने ह्या रेल्वेची पुर्तता पश्चिम रेल्वेच्या बांद्रा, मुंबई सेंटर किंवा अहमदाबाद टर्मिनल वरून करावी. वसईरोड स्टेशनला काही बोगी आरक्षित असाव्यात, तसेच ही रेल्वे नेहमीसाठी व पनवेल ते सावंतवाडी दरम्याने सर्व स्थानकांवर थांबणारी स्लो रेल्वे असावी जेणेकरून कोकणातील सर्व प्रवाशांना याचा फायदा होईल. पश्चिम रेल्वेवरून कोकण रेल्वे मार्गे गोवा कर्नाटक केरळात प्रत्येक आठवडयाला साधारण ५६ रेल्वे ये-जा करतात. मात्र मागील ५ वर्षे वसई वलसाड किंवा अहमदाबाद वरून सावंतवाडीपर्यंत पॅसेंजर मागत आहोत ती मिळत नाही, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे अशी खंत संघटनेनं व्यक्त केली आहे. तरी कोकण रेल्वे, पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे व लोकप्रतिनिधी यांनी या मागणीचा सहानुभूतीपुर्वक विचार करावा व ह्या रेल्वेची पुर्तता करण्यासाठी लवकरात लवकर रेल्वे बोर्डाकडे याची मागणी करावी अशी विनंती अध्यक्ष शांताराम नाईक, सेक्रेटरी यशवंत जडयार यांनी सीएम शिंदेंकडे केली आहे.