६२० प्रवासी, ६० वाहने आणि ६ तासांचा प्रवास
खेड | देवेंद्र जाधव : मुंबई गोवा मार्गावर १८० वर्ष जुन्या पद्धतीची वाहतूक व्यवस्था सुरु होणार आहे. ही वाहतूक व्यवस्था म्हणजे जलमार्ग वाहतूक आहे. मुंबई गोवा प्रवास ६ तासांत होणार आहे. रस्ते किंवा रेल्वेमार्गे नव्हे थेट समुद्रमार्गे अति जलद प्रवास करता येणार आहे. लवकरच मुंबई ते गोवा अशी रो रो बोट सेवा सुरु होणार आहे. या रो रो मधून एकाच वेळी ६२० प्रवासी आणि ६० वाहने जाऊ शकतात.
१४५ मध्ये बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनीची स्थापना झाली. या कंपनीच्या माध्यमातून मुंबई ते गोवा अशी जलवाहतूक सुरु करण्यात आली. मुंबईतून निघालेले जहाज रत्नागिरीनंतर जैतापूर, मालवण, वेंगुर्ला अशी बंदरं घेत घेत ती बोट गोव्याला जायचे. १९६४ नंतर ही जलवाहतूक बंद झाली. आता १८० वर्ष जुन्या पद्धतीची ही जलवाहतूक व्यवस्था पुन्हा सुरु होणार आहे. पुन्हा एकदा प्रवाशांना समुद्रमार्गे मुंबई ते गोवा हा प्रवास होणार आहे.
मुंबई ते गोवा हे अंतर ५८९ किमी इतके आहे. मुंबई ते गोवा या प्रवासाठी सध्या वाहतुकीचे दोन पर्याय आहेत. एक म्हणजे कोकण रेल्वे आणि दुसरा म्हणजे मुंबई गोवा महामार्ग. मुंबई गोवा महामार्गे प्रवासासाठी १० ते १२ तास लागतात. तर, रेल्वेने गेल्यास प्रवासासाठी ८ ते ९ तासांचा वेळ लागतो. मात्र, आता समुद्र मार्गे हाच मुंबई गोवा प्रवास फक्त ६ तासात शक्य होणार आहे.
जल वाहतूक सेवा देणाऱ्या एका खाजगी कंपनीच्या माध्यमातून मुंबई ते गोवा अशी रो रो बोट सेवा सुरु केली जाणार आहे. प्रवासी जहाजाच्या माध्यमातून प्रवाशांन मुंबई गोवा प्रवास करता येणार आहे. गोव्याला जाणारे हे खाजगी जहाज मुंबईतून निघेल. मुंबईतील माजगाव ते गोव्यातील मुरगाव दरम्यान अशी ही रो रो फेरी असेल.
मुंबई – गोवा रो रो ची ट्रायल रन झाली असल्याची माहिती समोर येत आहे. सुरुवातीच्या चाचणीत मुंबई-गोवा प्रवास ६.५ तासांत पूर्ण झाल्याचा दावा केला जात आहे. याला अंतिम मंजुरी मिळाल्या नंतर माझगाव डॉक ते पणजी जेट्टी डॉक पर्यंत फेरी सेवा सुरू होईल. परवानगीसाठी गोवा सरकारशी चर्चा सुरू आहे. ६२० प्रवासी आणि ६० वाहने वाहून नेण्याची क्षमतेचे हे जहाज असेल. मार्च २०२५ पर्यंत ही रो रो सेवा सुरु करण्याचे टार्गेट होते. मात्र, आता एप्रिस अखेरीस किंवा मे महिन्याच्या सुरुवातील ही वाहतूक सुरु होऊ शकते. या रो रो सेवेमुळे महाराष्ट्र आणि गोवा दोन्ही राज्यांच्या पर्यटनासाठी फायदा होणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ही रो रो सेवा सुरु करण्याच्या अनुषंगाने प्रयत्नशील आहेत