गॅस टँकर अपघातानंतर वसूल झालेल्या टोलची परतफेड
1.2 लाख प्रवाशांच्या FASTag खात्यात रक्कम जमा होणार
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या गॅस टँकर अपघातामुळे तब्बल 32 तास वाहतूक विस्कळीत झाली होती. या कालावधीत टोलवसुली स्थगित करण्याचे आदेश असूनही काही वाहनांकडून टोल आकारण्यात आल्याचे समोर आले. सुमारे 1.2 लाख प्रवाशांकडून वसूल झालेली एकूण 5.16 कोटी रुपयांची रक्कम आता परत केली जाणार आहे. ही रक्कम संबंधितांच्या FASTag खात्यात जमा केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी प्रहार डिजिटलशी बोलताना दिली. या घटनेनंतर एक्स्प्रेसवेवरील सुविधा आणि आपत्कालीन व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पुणे : 3 फेब्रुवारी रोजी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर खोपोलीजवळ गॅस टँकर बाजूला पलटल्याने निर्माण झालेल्या 32 तासांच्या वाहतूक कोंडीदरम्यान वसूल झालेला टोल आता प्रवाशांना परत दिला जाणार आहे. सुमारे 1.2 लाख वाहनचालकांना एकूण 5.16 कोटी रुपये परत केले जातील, अशी माहिती MSRDCच्या अधिकाऱ्यांनी प्रहार डिजिटलशी बोलताना दिली.
या परताव्यात एक्स्प्रेसवेसह पुणे-बेंगळुरू महामार्गावरील टोलचाही समावेश आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, गॅस टँकर दुर्घटनेनंतर टोलवसुली स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, आदेशानंतरही ज्या वाहनांकडून टोल आकारला गेला, त्यांचा डेटा संकलित करण्यात आला आहे. येत्या आठवड्यात संबंधित रक्कम FASTag खात्यात जमा केली जाणार आहे.
गेल्या आठवड्यात महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MSRDC)ने एका दिवसाहून अधिक काळ विस्कळीत झालेल्या वाहतुकीदरम्यान वसूल झालेला टोल परत करण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी IRB इन्फ्रास्ट्रक्चरकडून सविस्तर FASTag कपातीचा अहवाल मागवण्यात आला होता. टोलवसुली थांबवण्याच्या सूचनेनंतरही काही व्यवहार झाले का, याबाबत स्पष्टिकरणही मागवण्यात आले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, अडथळे पूर्णपणे हटवले जाण्यापूर्वी काही वाहनांच्या FASTagमधून रक्कम वजा झाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आदेशानंतर ज्या प्रवाशांकडून टोल आकारला गेला, त्यांची संख्या निश्चित करून ती रक्कम परत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
3 फेब्रुवारीच्या अपघातामुळे एक्स्प्रेसवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. हजारो प्रवासी मूलभूत सुविधांशिवाय अडकून पडले होते. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुले यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. अनेकांच्या नियोजित कार्यक्रमांवरही परिणाम झाला. खालापूर टोल प्लाझा येथे काही काळ टोलवसुली सुरू असल्याच्या बातम्यांमुळे संताप व्यक्त करण्यात आला.
या प्रकरणात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह विविध राजकीय पक्षांनी MSRDC, IRB आणि वाहतूक पोलिसांकडे टोल परताव्याची मागणी केली होती. तसेच आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा आणि एक्स्प्रेसवेवरील पायाभूत सुविधा याबाबत गंभीर त्रुटी अधोरेखित झाल्या. प्रवाशांच्या सुरक्षेपेक्षा टोलवसुलीला प्राधान्य दिल्याचा आरोपही करण्यात आला.
दरम्यान, अखिल भारतीय ग्राहक पंचायत आणि अखिल भारतीय ग्राहक हक्क संघटना यांनीही MSRDC आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला कायदेशीर नोटीस बजावली आहे. त्यांच्या प्रतिनिधींनी 32 तासांच्या ठप्प स्थितीदरम्यान प्रवाशांना आवश्यक सुविधा न पुरवल्याबद्दल जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी स्पष्ट धोरण आणि ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.











