वेंगुर्ले तालुक्यात शिक्षण विभागाने शिक्षण परिषद शाळेच्या वेळेत घेऊ नये..

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांचे गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन

वेंगुर्ले : प्रतिनिधी : शिक्षण विभागामार्फत प्रत्येक केंद्रस्तरावर महिन्यातून एकदा शिक्षण परिषद आयोजित केली जाते. सदरची शिक्षण परिषद प्रत्येक केंद्रातील कोणत्याही एका प्राथमिक शाळेमध्ये बोलवली जाते. त्यावेळी शाळा अर्धवेळ ठेवल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे शिक्षण विभागाने शिक्षण परिषद शाळेच्या वेळेत घेऊ नये अशी मागणी वेंगुर्ला तालुक्यातील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांनी निवेदनाद्वारे गटशिक्षणाधिकारी श्री. संतोष गोसावी यांच्याकडे केली आहे.

कोरोना काळात दोन वर्षे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान झालेले आहे. त्यामुळे शिक्षण परिषदं ह्या शालेय कामकाजा व्यतिरीक्त इतर वेळी घेणे. व तशा प्रकारचे आदेश आपले स्तरावरून केंद्रप्रमुखांना देण्यात यावे, असे या निवेदनात म्हटले आहे.

त्याच प्रमाणे बीएलओ सारख्या इतर कामांचे शिक्षकांना उद्दीष्ट न देता शिक्षकांना विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीचे उद्दीष्ट दयावे. प्राथमिक शाळांच्या भौतिक व शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती हे पद अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती यांचेशी शाळांच्या विकासाच्या दृष्टीने समन्वय आढावा या हेतूने तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकारी सर्व विस्तारप्रमुख केंद्रप्रमुख तालुका स्तरावर सर्व मुख्याध्यापक व अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती यांची संयुक्त सभा घेणे आवश्यक आहे. तरी अशा सभा तीन महिन्यातून एकदा घेणेबाबत आपण कार्यवाही करावी असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी तालुक्यातील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप परब, सुशील नाईक, संजय पिळणकर, प्रा.सचिन परुळकर, प्रवीण राजापूरकर, सूर्यकांत परब, सुशांत नाईक, उमेश पावणोजी आदी उपस्थित होते.