Shiladitya Chetia Died: आजारी पत्नीची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली अन्…; दुःखात आसामच्या गृहसचिवानं स्वतःवर गोळी झाडून संपवलं आयुष्य

सामचे गृहसचिव शिलादित्य चेतिया यांना त्यांच्या पत्नीच्या मृत्यूचा इतका धक्का बसला की स्वतःवर गोळी झाडून आयुष्य संपवलं. आसामचे गृह आणि राजकीय सचिव शिलादित्य चेतिया यांनी मंगळवारी गुवाहाटी येथील खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये पत्नीच्या मृतदेहासमोर स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडली.

पत्नीच्या मृत्यूनंतर काही मिनिटांतच त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पत्नीचा काही काळापूर्वी याच रुग्णालयात कर्करोगाने मृत्यू झाला होता. आसामचे गृहसचिव शिलादित्य चेतिया हे आयपीएस अधिकारी होते ज्यांना राष्ट्रपती शौर्य पदक मिळाले होते. त्यांचे वय 44 वर्षे होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2009 बॅचचे आयपीएस अधिकारी शिलादित्य चेतिया यांनी आयसीयूमध्ये आपल्या रिव्हॉल्व्हरने स्वत:वर गोळी झाडली. त्याआधी काही मिनिटांपूर्वी त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. राज्याचे गृहसचिव म्हणून पोस्टिंग करण्यापूर्वी, चेतिया यांनी तिनसुकिया आणि सोनितपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक (एसपी) आणि आसाम पोलिसांच्या चौथ्या बटालियनचे कमांडंट म्हणून काम केले होते. चेतियांची पत्नी दीर्घकाळ कर्करोगाने त्रस्त होती आणि गेल्या काही महिन्यांपासून रुग्णालयात दाखल होती.

पत्नीच्या मृत्यूने धक्का बसला

शिलादित्य चेतिया यांच्या पत्नी अगामोनी बोरबरुआ या ४० वर्षांच्या होत्या. नेमकेअर हॉस्पिटलमध्ये सायंकाळी 4.25 वाजता त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूच्या 10 मिनिटांनंतर आयपीएस अधिकारी चेतिया यांनीही या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पत्नीच्या मृत्यूनंतर, ते प्रथम आयसीयू केबिनमध्ये गेले आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना विनंती केली की, त्यांना त्यांच्या पत्नीच्या मृतदेहाजवळ प्रार्थना करायची आहे, म्हणून त्यांना काही काळ एकटे सोडावे. यानंतर त्याने सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने त्यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. गोळीबाराच्या आवाजाने रुग्णालयात एकच खळबळ उडाली.टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, नामकेअरचे व्यवस्थापकीय संचालक हितेश बरुआ म्हणाले, ‘आम्ही गोळीचा आवाज ऐकला तेव्हा आम्ही धावलो आणि ते पत्नीच्या मृतदेहाजवळ पडलेले आढळले. आम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य झाले नाही. त्यांनी स्वतःवर गोळी झाडली होती. आगमोनी यांच्यावर सुमारे दोन महिने रुग्णालयात उपचार सुरू होते. तीन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती. 12 मे 2013 रोजी त्यांचे लग्न झाले होते आणि त्यांना मूलबाळ नव्हते.

राष्ट्रपतींकडून मिळाला होता सन्मान

आसामचे डीजीपी जीपी सिंह यांनी चेतियाच्या मृत्यूची पुष्टी केली. या घटनेबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला. चेतिया यांनी तिनसुकिया, नलबारी, कोक्राझार आणि बारपेटा जिल्ह्यांत पोलीस अधीक्षक म्हणून काम केले होते. त्याचे वडीलही पोलीस अधिकारी होते. आपल्या शौर्य आणि धैर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या चेतिया यांनी गुन्हेगारी आणि दहशतवादी संघटनांविरुद्ध अनेक ऑपरेशन्सचे नेतृत्व केले होते. यासाठी त्यांना 2015 मध्ये स्वातंत्र्यदिनी शौर्याबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक मिळाले होते.