ग्रामस्थांची एकत्रित बैठक घेण्याचे दूरध्वनीवरून दिले आश्वासन
तारामुंबरी – मिठमुंबरी पूल ते कुणकेश्वर जोडणारा रस्ता पैकी काही भाग अद्यापही डांबरीकरण होण्याचा बाकी आहे. तेथील जमीन मालकांच्या मागण्यांमुळे रस्ता खडीकरण व डांबरीकरण होण्यास अडचण निर्माण झाली आहे. या सर्व जमीन मालकांची बैठक लावून त्यांच्या समस्यांचे निराकरण करू, असे आश्वासन आमदार नितेश राणे यांनी दिले. लवकरच या बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.
तारामुंबरी – मिठमुंबरी पुलापासून मिठमुंबरी किनारपट्टीवर असणाऱ्या रस्त्यापैकी काही भाग अद्यापही डांबरीकरण होणे बाकी आहे. या रस्त्यासाठी योग्य नुकसान भरपाई मिळावी म्हणून स्थानिकांची मागणी आहे. शासन देत असलेली नुकसान भरपाई त्यांना मान्य नाही. याप्रकरणी न्यायालयामध्ये दावा सुरू असून अद्यापही यातून मार्ग निघत नाही.
आज सार्वजनिक बांधकाम तर्फे या रस्त्याची मोजणी घेण्यात आली होती. यावेळी सार्वजनिक बांधकामचे उपकार्यकारी अभियंता बासुतकर आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह उपस्थित होते. तसेच भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटमहि उपस्थित होते. रस्ता रुंदीकरण करताना समुद्राच्या बाजूने करावा. मोजणीच्या नोटिसा सर्वांना द्याव्यात, यासह अनेक मागण्या जमलेल्या ग्रामस्थांनी केल्या. अखेर, आमदार नितेश राणे यांनी दूरध्वनीवरून ग्रामस्थांशी संवाद साधला आणि आपण लवकरच बैठक घेऊन यावर सर्वमान्य तोडगा काढू, असे आश्वासन दिले आहे.












