रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे माजी कार्याध्यक्ष स्वर्गीय अरूअप्पा जोशी यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले. स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी स्वर्गीय अरूअप्पा जोशी यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले. आपल्या मनोगतात प्राचार्य डॉ. साखळकर यांनी अरूअप्पांच्या स्मृतींना उजाळा दिला. ज्या काळात जैवतंत्रज्ञान सूक्ष्मजीवशास्त्र, जैव रसायनशास्त्र, संगणकशास्त्र विभागांची सुरुवात करणे कठीण मानले जात असे, अशा काळात अरूअप्पांनी याविषयाचे महत्त्व ओळखून हे विभाग महाविद्यालयात सुरू केले. कोणतेही काम धाडसाने सुरू करणे आणि ते पूर्णत्वास नेणे हा त्यांचा बाणा होता असे ते म्हणाले.
१९९४ ते २००७ या काळात अरूअप्पा जोशी यांनी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष म्हणून धुरा सांभाळली.या काळात संस्थेची प्रगती झाली आणि संस्था नावारूपाला आली. त्यासाठी अरूअप्पांनी खूप प्रयत्न केले. कोकणातील विद्यार्थ्यांनी संशोधन करावे आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हावे अशी त्यांची इच्छा होती. विकासासाठी सदैवकार्यरत असले पाहिजे, ही शिकवण अरूअप्पांकडून घेणे आवश्यक आहे.हेच त्यांना अभिवादन ठरेल अशी अपेक्षा प्राचार्य डॉ. साखळकर यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. सीमा कदम तसेच अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी यांची उपस्थिती लाभली.
महाविद्यालयातील विविध विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने या अभिवादन कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ. मेघना म्हादये यांनी केले.












