मान्सून केरळात दाखल!

महाराष्ट्रात कधी बरसणार ?

केरळ: उकाड्याने हैराण झालेल्या सर्वांच्या नजरा पावसाकडे लागल्या आहेत. त्यातच यंदा पाऊस लवकर पडणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. मान्सून आता केरळात दाखल झालाय.

 

 

 

 

 

 

गेल्या दोन – चार दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडतोय. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्यांना दिलासा मिळतोय तर शेतकऱ्यांना फटका बसतोय. मात्र मान्सून आता केरळात दाखल झालाय. त्यामुळे मान्सून महाराष्ट्रात केव्हा बरसणार आहे याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. गोवा, कर्नाटक आणि केरळमध्ये वळवाचा पाऊस सुरु आहे. यंदा मान्सून आठवडाभर लवकरच येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. २७ मे रोजी मान्सून दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाज यंदा खरा ठरलाय.

 

 

 

केरळात दाखल झालेला मान्सून हा दक्षिण आणि मध्य अरबी समुद्र, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्र, लक्षद्वीपचा काही भाग, कर्नाटक, तामिळनाडू, दक्षिण आणि मध्य बंगालचा उपसागर या भागात पुढे सरकणार आहे. दक्षिण कोकण-गोवा किनाऱ्यावरील पूर्व मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीच्या काही भागात पाऊस आणि वारा यामध्ये बदल होऊ शकतो असा अंदाज हमावान खात्याने वर्तवलाय. आता पुढील साधारण ७ ते ८ दिवसांत म्हणजेच ६ जूनच्या आसपास मान्सून महाराष्ट्रात पोहण्याचा अंदाज आहे. कोकण किनारपट्टी, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्गसारख्या भागांत प्रथम पाऊस पडेल. यंदा मान्सूनच्या पावसाचं प्रमाणही सरासरीएवढं किंवा त्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.

 

 

मान्सूनचा प्रवास पाहता कोकणानंतर तो १० जूनपर्यंत मराठवाडा आणि विदर्भात पोहोचू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आलाय.