आज तांत्रिक व पर्यटनावर आधारित रोजगार निर्माण करणारे शिक्षण आवश्यक : मनिष दळवी 

रेडी विद्यामंदिरच्या नविन इमारतीचे उद्घाटन : खास. नारायण राणे यांच्या कडून २५ लाखांचा निधी उपलब्ध

वेंगुर्ले l दाजी नाईक :सध्याचे युग हे संगणकीय आणि स्पर्धेचे युग आहे. या युगात टिकायचे असेल तर दर्जेदार शिक्षणाबरोबर तांत्रिक व पर्यटनावर आधारित शिक्षण घेणे काळाजी गरज आहे. नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे मोठे उद्योजक व्हा. रेडी गांवात दर्जेदार शिक्षणाबरोबर तांत्रिक व पर्यटनावर आधारित रोजगार निर्माण करणारे शिक्षण सुरू करून नव्या पिढीला दिशा देण्याचे कार्य करावे, असे प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी केले.

रेडी येथील श्री माऊली विद्यामंदिरच्या नविन इमारतीसाठी खासदार नारायण राणे यांनी खासदार फंडातून २५ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला होता. या नुतन इमारतीचे उद्घाटन जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते २४ सप्टेंबर रोजी करण्यात आले. यावेळी भाजपाचे वेंगुर्ला अध्यक्ष विष्णू परब, संस्थेचे संचालक पांडुरंग कौलापुरे, राजेंद्र कांबळी, प्रदिप प्रभू, सरपंच रामसिग राणे, उपसरपंच लक्ष्मीकांत भिसे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ, माजी सभापती अजित सावंत, आरवली सरपंच समिर कांबळी, माजी सरपंच अनंत कांबळी, दिपक राणे, मुख्याध्यापक सी.एम.जाधव, सुविधा कांबळी, पालक संघटनेचे अध्यक्ष काका गवंडी, नमिता नागोळकर, दादा नाईक, भानुदास राणे, गोपाळ राऊळ उपस्थित होते. संस्था व रेडी ग्रामपंचायतीतर्फे मनिष दळवी यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

रेडी गावात उषा ईस्पात, टाटा मेटालिक कंपनी बंद झाल्यानंतर येथील जमिनी आज ओस पडल्या आहेत. त्या जमिनीत रोजगार करणारे उद्योगधंदे निर्माण करून येथील बेकारी दूर करा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी मनिष दळवी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावर रेडी गावांतील छोटे मोठे उद्योजक, व्यावसायीक, विविध क्षेत्रातील नागरिक व सर्व पक्षिय एकत्र येऊन एक समिती तयार करून वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करून रेडी गावात उद्योगधंदे आणूया. त्यासाठी माझे सर्वोतोपरी सहकार्य राहील असे अभिवचन श्री. दळवी यांनी दिले. यावेळी प्रितेश राऊळ, अजित सावंत, सरपंच रामसिग राणे यांनी मनोगत व्यक्त केली. सूत्रसंचालन व आभार राजेंद्र कांबळी यांनी मानले.