मुंबई गोवा महामार्गाच्या कामावर लांबलेल्या पावसामुळे परिणाम
भातशेतीसह आंबा पिकाचे झालेल्या नुकसानीचे सर्व्हेक्षण होणे आवशयक
पत्रकार परिषदेत दिली सविस्तर माहिती
रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यात नव्याने रस्ते तयार होत आहेत, ते करताना नियोजनबद्ध पद्धतीने करून या रस्त्यांमुळे औद्योगिक आणि पर्यटनदृष्ट्या कसा उपयोग होईल त्या दृष्टीने आराखडा तयार करण्याच्या सूचना मी संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या आहेत अशी माहिती माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. लांबलेल्या पावसाचा परिणाम मुंबई गोवा महामार्गाच्या कामावर झाला आहे, मात्र ते जलद गतीने मार्गी लागावे यासाठी पाठपुरावा करणार असून यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन मंडळ सभागृहात आयोजित जनता दरबारानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नारायण राणेंवर जनता नाराज नसते, म्हणूनच मी इतक्यांदा निवडून आलो आहे. हे जनता दरबार मी स्वतः आयोजित केले असून जनता त्यांचे निर्माण झालेले नवनवीन प्रश्न सोडवण्यासाठी येत आहे. ते लवकरात लवकर सोडवण्यासाठी, मार्गी लावण्याच्या सूचना मी प्रशासनाला केल्या असल्याचे खा. राणे यांनी सांगितले. जिल्ह्यात नवीन रस्ते होत आहेत, ते होत असताना प्लॅनिंग करत असताना, नवीन रस्त्याच्या बाजूला उद्योगधंदे यावेत यासाठी आतापासून रिझर्वेशन ठेवा, जागा उपलब्ध करून ठेवा असे सांगत रत्नागिरी कोल्हापूर महामार्ग विकसित होत असताना तिथे औद्योगिक दृष्ट्या विचार करून, पर्यटकांच्या दृष्टीने विचार करून त्या ठिकाणी आवश्यक सुविधा, जागा नियोजित करून ठेवा असे जिल्हाधिकारी तथा अधिकाऱ्यांसोबत आज झालेल्या बैठकीत मी सांगितले आहे असे खा. राणे म्हणाले.
केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आहे आणि या सरकारवर जनता खुश आहे, समाधानी आहे याचा प्रत्यय दौऱ्यात आला असेही त्यांनी सांगितले. सर्वसामान्यांनी त्यांच्या हक्कासाठी त्यांचे प्रश्न या तीन दिवसात मांडले. जनता दरबारामध्ये अधिकाऱ्यांना सहभागी करून घेतले होते. जनतेचे प्रश्न जेव्हा येतात तेव्हा ते अधिकाऱ्यांनी ऐकावे, त्यांच्या भावना ऐकाव्यात आणि भावनांचा आदर करून प्रश्न जलद गतीने सोडवावे, नियमातल्या कामांना विलंब लागू नये असे मला वाटते. त्या दृष्टीने इथले प्रशासन काम करते आहे असे सांगत असे असले तरीही समाधान हा शब्द केव्हा वापरायचा याची मला पूर्ण माहिती आहे असेही खा. राणे म्हणाले.
या जनता दरबारात बेकारीपासून शिक्षणापर्यंत सगळे विषय समाविष्ट होते. सर्व विषयांमध्ये अधिकाऱ्यांनी कसं काम करावं हे त्यांना सांगितले, ते काय करतात हे जाणून घेतले. एका दिवसात एका दिवसांत हे सर्व प्रश्न सुटणार नाहीत पण त्याचा पाठपुरावा केला जाईल असेही ते म्हणाले. राज्य सरकार कोकणासाठी केंद्राकडे जे मागतं ते मिळते. यंदाच्या पावसात केवळ भात शेतीच नव्हे तर आंब्यावर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर पर्यंत पाऊस लांबल्याने मोहोरावर परिणाम होऊ शकतो. त्याचाही विचार झाला पाहिजे असेही खा. राणे म्हणाले.
यावेळी महाविकास आघाडी काढणार असलेल्या मोर्चा आणि बच्चू कडू यांच्या आंदोलनावर त्यांनी टीका केली.महायुतीचा निर्णयवरिष्ठ घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले.












