खेड (प्रतिनिधी): कोकण हा आजही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाच आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारा कोकण आहे, असा ठाम विश्वास शिवसेना नेते रामदास कदम यांनी व्यक्त केला. खेड नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवारांनी नगराध्यक्षांसह 21 पैकी 21 जागांवर विजय मिळवत पुन्हा एकदा भगवा फडकावला असून, कोकणवासीयांनी एकनाथ शिंदे हेच शिवसेनाप्रमुखांचे विचार पुढे नेणारे खरे वारसदार आहेत, यावर शिक्कामोर्तब केले आहे, असे ते म्हणाले.
माध्यमांशी बोलताना रामदास कदम म्हणाले की, 2001 सालाच्या सुमारास खेडमध्ये शंभर टक्के शिवसेनेचे नगरसेवक निवडून आणण्याचा योग आला होता. आज पुन्हा एकदा नामदार योगेश कदम यांनी चमत्कार घडवत खेडमध्ये महायुतीला ऐतिहासिक विजय मिळवून दिला, याचा मला अभिमान आणि आनंद आहे. या विजयामागे खेडच्या जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांची मेहनत आहे.
या वेळी त्यांनी विशेषतः खेडमधील मुस्लिम बांधवांचे मनापासून आभार मानले. मुस्लिम बांधव माझ्यासोबत ठामपणे उभे राहिले नसते, तर कदाचित आज खेडवर भगवा फडकला नसता, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ‘हम सब एक है’ या भावनेतून जातीपातीचे राजकारण बाजूला सारत सर्वधर्मसमभाव जपत खेडच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना रामदास कदम म्हणाले की, आमदार योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली खेड नगरपरिषद भविष्यात महाराष्ट्रातील एक आदर्श आणि मॉडेल नगरपरिषद बनेल. मोठ्या प्रमाणात निधी आणून प्रलंबित विकासकामे पूर्ण केली जातील आणि खेडचा सर्वांगीण विकास साधला जाईल. खेडवासीयांच्या मनातील विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.
या ऐतिहासिक विजयामुळे कोकणातील राजकारणात महायुतीची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार अधिक बळकट झाल्याचे चित्र खेडमध्ये दिसून येत आहे.












