निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान; ममता बॅनर्जींची तीव्र टीका
‘अघोषित आणीबाणी’चा आरोप; सुनावणी लवकरच होण्याची शक्यता
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात कलकत्ता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज्य सरकारशी सल्लामसलत न करता बदल्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या कारवाईवर तीव्र टीका करत याला ‘अघोषित आणीबाणी’ म्हटले आहे. या प्रकरणाची सुनावणी लवकरच होण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगाल : विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर भारतीय निवडणूक आयोगाने राज्यातील अनेक आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याने वाद निर्माण झाला आहे. याविरोधात तृणमूल काँग्रेसने कलकत्ता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. टीएमसी नेते आणि वकील कल्याण बॅनर्जी यांनी दाखल केलेल्या याचिकेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
याचिकेत राज्य सरकारशी सल्लामसलत न करता अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. या प्रकरणाची सुनावणी पुढील आठवड्याच्या सुरुवातीला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. १५ मार्च रोजी निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर काही तासांतच मुख्य सचिव, गृह सचिव आणि पोलिस महासंचालकांसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत याला “अघोषित आणीबाणी” असे संबोधले. त्यांनी या कारवाईला “राजकीय सूडबुद्धीने प्रेरित आणि संस्थात्मक हस्तक्षेप” असे म्हटले आहे. तसेच त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून निवडणूक आयोगाला “मनमानी आणि पक्षपाती निर्णय टाळण्याचे” आवाहन केले आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आंतरराज्य बदल्यांना तात्पुरता स्थगिती दिली आहे. यामध्ये बिधाननगर, सिलीगुडी, बॅरकपूर आणि हावडा येथील पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच काही अधिकाऱ्यांना तमिळनाडू आणि कर्नाटक येथे बदली करण्याचे आदेशही रोखण्यात आले आहेत.
२९४ सदस्यीय पश्चिम बंगाल विधानसभेसाठी २३ आणि २९ एप्रिल रोजी दोन टप्प्यात मतदान होणार असून ४ मे रोजी मतमोजणी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे.











