जिल्हा मोटार ट्रेनिंग स्कूलच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी मदत पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी:– जिल्हा मोटार ट्रेनिंग स्कूलच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.
रत्नागिरी जिल्हा मोटार ट्रेनिंग स्कूल असोसिएशनच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आज पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीला उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, मोटार वाहन निरीक्षक प्रशांत जाधव, नगरसेवक बंड्या साळवी, मोटार ट्रेनिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष महेश पंडित, सचिव अमित कदम, मिलींद सावंत, स्कूल बस संघटनेचे पदाधिकारी मंगेश विचारे, रिक्षा संघटनेचे अविनाश कदम आदी उपस्थित होते.
यावेळी प्रशिक्षणासाठी जागेची उपलब्धतता, कौशल्य विकास, शासकीय योजनांचे लाभ याबाबतच चर्चा करण्यात आली. उप प्रादेशिक कार्यालयाच्या सॉफ्टवेअरमधील ऑनलाईन त्रुटी दूर करण्यात याव्यात. नवीन चालकांना प्रशिक्षण देण्यासाठी जागेची आवश्यकता असून, एमआयडीसीमधील कमी रहदारी असणाऱ्या रस्त्यावर प्रशिक्षणाची परवानगी मिळावी तसेच शासनाची परवानगी न घेता सुरु असणाऱ्या अनधिकृत शाळांवर कारवाई करण्यात यावी, मोटार ट्रेनिंग स्कूल चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ निर्माण करुन, त्यातून शासकीय अनुदान मिळावे अशी मागणी असोसिएशनच्या सदस्यांनी केली. या बाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करुन पाठपुरावा करण्यात येईल असे पालकमंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले. नवीन मोटार ट्रेनिंग स्कूलची मान्यता व नुतनीकरणाचे प्रस्ताव प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल येथे पाठवावे लागत असल्याने या प्रक्रियेला अनेकदा विलंब होतो त्यामुळे सदरची सुविधा प्रादेशिक स्तरावर न होता जिल्हास्तरावर उपलब्ध करुन मिळावी असेही असोसिएशनच्या सदस्यांनी सांगितले. याबाबतही परिवहन मंत्र्यांशी चर्चा करुन कार्यवाही करण्यात येईल असे डाॕ सामंत यांनी सांगितले. आंबा, काजू, मच्छी यांची वाहतूक करणाऱ्या स्थानिक वाहतूकदारांच्या काही समस्या असल्यास त्याबाबतही उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सहकार्य करावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या
*धर्मवीर आनंद दिघे साहेब ऑटो रिक्षाचालक कल्याणकारी महामंडळामध्ये नोंदणी करण्याचे आवाहन*
शासनाने सन 2024 मध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेब ऑटो रिक्षा चालक कल्याणकारी महामंडळ स्थापन केलेले आहे. या महामंडळामध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त रिक्षाचालकांनी नोंदणी करुन महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सामंत यांनी यावेळी केले. नोंदणी शुल्काबाबत सिंधुरत्न समृध्द योजनेतून आर्थिक मदत केली जाईल, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.