​माजगाव ग्रामपंचायतीवर महायुतीच्या रंजना कानसे यांचा विजयी

अपक्ष उमेदवाराचा १५८ मतांनी पराभव

​सावंतवाडी । प्रतिनिधी : माजगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी झालेल्या अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत भाजप महायुतीच्या उमेदवार रंजना रवींद्र कानसे यांनी विजय संपादन केला आहे. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार जयश्री दिनेश सावंत यांचा १५८ मतांनी पराभव करून सरपंच पदावर मोहोर उमटवली. या विजयामुळे माजगावचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी माजगावमध्ये आपला करिष्मा कायम राखला आहे.

​ ​​रंजना रवींद्र कानसे (विजयी) यांना ८८२ मते तर प्रतिस्पर्धी ​जयश्री दिनेश सावंत यांना ७२४ मते मिळाली. १५८ मतांनी रंजना कानसे यांचा विजय झाला. ​या निवडणुकीत मतदारांचा संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. एकूण ४१८५ नोंदणीकृत मतदारांपैकी केवळ १६७९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकूण ४०.११ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे झालेल्या कमी मतदानाचा फटका कोणाला बसतो याची जोरदार चर्चा होती. मात्र भाजप महायुतीने आपला गड कायम राखला .
​सुरुवातीपासूनच या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. भाजप शिवसेना महायुतीने ही जागा प्रतिष्ठेची केली होती, तर अपक्ष उमेदवार जयश्री सावंत यांनीही तगडे आव्हान उभे केले होते. मात्र, अंतिम मतमोजणीत रंजना कानसे यांनी सातत्य राखत आघाडी घेतली आणि विजय खेचून आणला.
​ ​विजयाची घोषणा होताच भाजप शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष साजरा केला. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन नवनिर्वाचित सरपंच रंजना कानसे यांनी यावेळी दिले.

विजयानंतर ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन रंजना कानसे यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग व जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी पंचायत समिती सदस्य महेश धुरी, माजी उपसरपंच संजय कानसे, मधुकर देसाई, शाम कासार, बाळा वेजरे आदी उपस्थित होते.
हा विजय भाजप महायुतीचा असून महायुतीच्या माध्यमातून माजगाव गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करणार आहोत. पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून तसेच महायुतीच्या सर्व लोकप्रतिनिधी व नेत्यांच्या सहकार्याने गावासाठी जास्तीत जास्त निधी आणून गावाचा विकास साध्य करू अशी ग्वाही यावेळी जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी दिली.

दरम्यान, तालुक्यातील नाणोस ग्रामपंचायतच्या सदस्य पदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे रवींद्र जोशी हे ५८ मतांनी विजयी झाले. विजयानंतर जिल्हाप्रमुख संजू परब यांनी त्यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या. या दोन्ही विजयामुळे तालुक्यात महायुतीचे प्राबल्य पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.