सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झाली महत्वाची बैठक
गुहागर | प्रतिनिधी : गुहागर तालुक्यातील जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या आरजीपीपीएल या ऊर्जा निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या भूसंपादन आणि त्याचा जमीन मालकांना मिळणारा मोबदला याबाबतचे अनेक विषय प्रलंबित असून गेले 25 वर्ष याचा पाठपुरावा यशवंत बाईत, विठ्ठल भालेकर, आत्माराम मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून सतत शासकीय दरबारी चालू होता. पण त्याला आजपर्यंत पूर्णविराम मिळत नव्हता. त्याच बरोबर कंपनीने ग्रामपंचायतीला आवश्यक असणारा इमारत कर बंद करून याबाबत पंचायत समितीमध्ये कंपनीने दाखल केलेले अपील ग्रामपंचायतीने जिंकत कंपनीने ईमारत कर द्यावा असा निकाल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी दिलेला असताना सुद्धा कंपनीचे अधिकारी पुन्हा जिल्हा परिषदेकडे अपिलात गेले.
याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना करणार असल्याचे यावेळी बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले. त्याचबरोबर कोकण एलएनजी आणि या प्रकल्पाच्या भविष्यासाठी आवश्यक असणारी ब्रेक वॉटर बांधणारी कंपनी एल अँड टी या दोन्हींमध्ये स्थानिकांना डावलून इतरांना रोजगार देण्याची चुकीची प्रक्रिया होत असल्याचे यावेळी या स्थानिकांनी बांधकाम मंत्री चव्हाण यांच्या लक्षात आणून दिले. त्यामुळे कंपनीच्या दोन्ही अधिकाऱ्यांना सूचना देत अंजनवेल, वेलदुर, रानवी, धोपावे, नवानगर येथील प्रकल्पग्रस्त आणि परिसरातील लोकांनाच प्राधान्याने रोजगार देण्याच्या सूचनाही चव्हाण यांनी कोकण एलएनजी आणि एल अँड टी च्या अधिकाऱ्यांना केल्या.
गेले २० ते २५ वर्षे भूसंपादनाची प्रलंबित असणारी प्रक्रिया आणि काही वर्षांपूर्वी बंद केलेला इमारतींचा कर याबाबत उपविभागीय अधिकारी श्री लिगाडे यांनाही या कामी विशेष लक्ष देऊन या संदर्भातल्या बैठकांचे आयोजन माजी आमदार डॉ.विनय नातू, जिल्हाध्यक्ष केदार साठे, तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक ठिकाणी करून शेतकऱ्यांना त्यांचे विषय तातडीने मोकळे करून देण्याच्या सूचना चव्हाण यांनी केल्या. ग्रामपंचायतीचे माजी सरपंच यशवंत बाईत हे गेले अनेक वर्ष याबाबत लढा देत असून त्यांच्या लढ्याला म्हणावे तेवढे यश येत नव्हते. ही गोष्ट उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत मंत्रालयात बैठक आयोजन करण्याची मागणी चव्हाण यांच्याकडे केली. या संदर्भात महत्त्वाची बैठक सोमवार दिनांक ६ नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी ठीक 12:30 वाजता मंत्रालयामध्ये आयोजित केली होती. याचबरोबर एल अँड टी कंपनीची रात्री समुद्रमार्गे बार्जेसमधून होणारी दगड वाहतूक ही बंद करण्यात यावी आणि दिवस रात्र चालणाऱ्या या वाहतुकीमुळे स्थानिक मच्छीमार व्यवसायिकांचे जे नुकसान होते त्याची भरपाई तातडीने संबंधित कंपनीने करून देण्याच्या सूचना रवींद्र चव्हाण आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे अधिकारी यांनी एल अँड टी आणि एल एन जी च्या अधिकाऱ्यांना केल्या.
या बैठकीसाठी आरजीपीपीएलचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी श्री लिगाडे, कोकण एलएनजीचे अधिकारी,एल अँड टी कंपनीचे अधिकारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे सर्व अधिकारी त्याच बरोबर माजी आमदार डॉ.विनय नातू, जिल्हाध्यक्ष केदार साठे, अंजनवेल ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि पंचायत राज आणि ग्राम विकाससेल चे उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे संयोजक यशवंत बाईत, गुहागर तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे भाजपाचे सरचिटणीस श्री विठ्ठल तथा बावशेठ भालेकर, पंचायत समितीचे माजी सदस्य आत्माराम मोरे, गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, तालुका सरचिटणीस आणि संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष सचिन ओक, आर जी पी एल कामगार युनियन अध्यक्ष भरत भुवड आणि उपाध्यक्ष मनोहर पारधी भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी ओबीसी सेल अध्यक्ष संतोष जैतापकर, अंजनवेल ग्रामस्थ काका कदम आदी उपस्थित होते.












