तळवडेत दोन एकर जागेतील काजु बागेस आग : लाखोंचे नुकसान

सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी तालुक्यातील तळवडे परबवाडी येथे दोन एकर क्षेत्रातील काजू बागेस आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. संबंधित काजू बागेचा प्रशासनाने पंचनामा करावा व नुकसान भरपाई द्यावी असे आवाहन संबधित शेतकर्‍यांनी केले आहे.
तळवडेत आग लागून झालेल्या या नुकसानीत अनिल परब, सुनील परब,मकरंद परब या शेतकऱ्यांचा समावेश आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप पर्यंत समजू शकले नाही. मात्र, या आगित काजू कलमे जळून खाक झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे.

दुपारच्या वेळी आग लागली होती ती आटोक्यात आणणे कठीण झाले होते. परंतु परब कुटुंबीयांनी तात्काळ धाव घेत संबंधित आग आटोक्यात आणली. अन्यथा या ठिकाणी असलेल्या आजूबाजूच्या बागेत हे आग जाऊन मोठ्या प्रमाणात काजू बागेचे तसेच आंबा कलमांचे नुकसान होणार होते. आग विझवण्यासाठी मुन्ना परब, ओंकार परब, सर्वेश परब, बंटी परब, रवी परब, अनिल परब, अक्षय परब, अथर्व परब, अमित परब तसेच प्रथा परब यांनी प्रयत्न करून आगीवर ताबा मिळवला. आगीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी परब कुटुंबीयांनी केली आहे.