चिपळूण (प्रतिनिधी):– कोकण विकासापासून वंचित राहता कामा नये शिवाय इथल्या जमिनी कोणाच्या तरी ताब्यात जाता कामा नये, कोकणातील जमिनीवर विकण्यापेक्षा त्या जमिनीवर व्यवसाय उभारा. कोकणातील जमिनीमध्ये उपयुक्त शेती होवू शकते, याचा अभ्यास न करुन त्या जमिनी शेती लागवाडीखाली आणा, त्या पिकाचे मार्केट तयार करण्यासाठी तसा प्रयत्न झाला पाहिजे, असे मत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले.
शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात अखिल भारतीय मराठा महासंघ, रत्नागिरी शाखा यांच्यावतीने मराठा शक्ती संस्कृती जागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, राज्यात इतकी सारी महामंडळं असताना त्या तुलनेत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळ सर्वात जास्त काम करत आहे. याचे कारण म्हणजे मराठा समाजात या महामंडळविषयी जागृती निर्माण होत असून महामंडळातून मिळणाऱ्या योजनेतून आज मराठा समाजातील बांधव उद्योग, व्यवसायामध्ये यशस्वी होवू लागले आहेत. मराठा समाजाने महामंडळातून मिळणाऱ्या संधीतून व्यवसाय, उद्योगात सक्षम झाले पाहिजे. औद्योगिक क्षेत्रातील जमिनी अनेक वर्ष ताब्यात घेऊन त्यावर उद्योग उभारलेले नाहीत. यात प्रामुख्याने उद्योगपती व एमआयडीसीच्या अधिकाऱ्याचे मोठे रॅकेट आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी याविषयी आवाज उठवून उद्योग न उभारलेल्या त्या जमिनी स्थानिक लोकांना व्यवसाय उद्योगाला देण्यासाठीचा प्रयत्न केला पाहिजे. याविषयी स्थानिक लोकप्रतिनिधींनी खऱ्या अर्थाने जागृत राहिले पाहिजे. लोकप्रतिनिधींनी केवळ गटार, रस्ते इथपर्यंत मर्यादित न राहता आपल्या मतदार संघातील तरुणवर्गाला रोजगार कसा उपलब्ध होईल, यासाठी विशेष प्रयत्न केला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अ.भा. मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे म्हणाले की, कोकणातील मराठा समाजाला प्रत्येक घटकात व्यावहारीक रहायचे असेल तर व्यावसयिक, उद्योगासाठीच्या पळवाट न काढता त्याकडे जावे लागणार आहे. मराठा बांधवानी व्यावसायिक, उद्योगाकडे वाटचाल करण्यासाठी शंका न काढता धोरणाची चिकित्सा करत सातत्याने उपलब्ध संधी शोधल्या पाहिजेत. यासाठी मराठा समाजातील तरुणांनी पुढे आले पाहिजे, या कामासाठी ग्रुप तयार करा. निश्चित यातून समाजातील प्रश्न सोडवले जातील, असेही त्यांनी मत व्यक्त केले.
यावेळी माजी आमदार संजय कदम. रामवरदायिनी ट्रस्टचे अध्यक्ष प्रताप शिंदे, कोकण भूमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संजय यादवराव, क्षत्रिय मराठा संघटनेचे लक्ष्मण बामणे, राजन घाग, उद्योजक अविनाश शिंदे, प्रकाश देशमुख दीपक शिंदे, श्रीकृष्ण वाभळे, राजकपूर सिंग, चिपळूण अर्बन बँकेचे चेअरमन मोहन मिरगल, रामदास राणे आदींसह अ. भा. मराठा महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.












