वेंगुर्ले : प्रतिनिधी
अणसूर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात भदगावडेवाडी याठिकाणी भारत संचार निगम लि. कंपनीचा असलेला भ्रमणध्वनी मनोरा कार्यान्वित करण्यात यावा, अशी मागणी अणसूर ग्रामपंचायत मार्फत सावंतवाडी येथील भारत संचार निगम लि.चे जिल्हा प्रबंधक यांच्याकडे निवदेनाद्वारे केली आहे. मागणी मान्य न झाल्यास उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे.
अणसूर-भदगावडेवाडी येथे भारत संचार निगम लि.कंपनीचा भ्रमणध्वनी मनोरा उभारण्यात आलेला असून हा मनोरा मागील एक वर्षापूर्वी पूर्ण झालेला आहे. तरी अद्यापपर्यंत मनोरा कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री आस्थापित केलेली नसल्याने मनोरा कार्यान्वित होऊ शकलेला नाही. मनोरा ज्या जागी बांधलेला आहे, त्याच्या आसपास अन्य कुठल्याही कंपनीची ध्वनी लहरी उपलब्ध नाही, असे निवदेनात नमूद केले असून येत्या पंधरा दिवसात भ्रमणध्वनी मनोरा कार्यान्वित न केल्यास आपल्या कार्यालयासमोर उपोषणला बसणार असल्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.












