खेड : रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत शुक्रवारी सकाळी खेड शहरात दाखल झाले असता त्यांनाही तीव्र वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. मंत्री महोदयांचा ताफाही खेड–भरणे रस्त्यावरील कोंडीत अडकून पडला. साधारणपणे मंत्र्यांचा ताफा जाताना वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेष व्यवस्था केल्या जातात; मात्र यावेळी तसे कोणतेही प्रयत्न दिसून न आल्याने या प्रकरणाची मोठी चर्चा झाली.
सध्या खेड–भरणे रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. भरणे नाका परिसरात खोदण्यात आलेल्या रस्त्यामुळे शहरात येणाऱ्या वाहनांची कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने “रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता?” असा सवाल नागरिकांतून सातत्याने उपस्थित केला जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते खेड–दापोली रस्त्याच्या नूतनीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. मात्र वर्ष उलटून गेले तरी रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण अवस्थेत असून अनेक ठिकाणी कामाचा वेग अत्यंत मंद असल्याची नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत.
खेड शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमण आणि अरुंद मार्गांमुळे नेहमीच कोंडीची समस्या उद्भवते. भरणे नाका परिसरात ब्रिजखालील भागात तर कायमच वाहतुकीचा गोंधळ दिसून येतो. या ठिकाणी असलेली पोलीस चौकी बहुतेक वेळा बंद अवस्थेत असल्याने वाहतूक नियंत्रणाचे पूर्ण बोजावरा उडाल्याचे नेहमीच पाहावयास मिळते. या सर्व समस्यांचा त्रास सर्वसामान्य नागरिक दररोज सहन करत असतानाच शुक्रवारी याच कोंडीचा अनुभव जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनाही आला. त्यामुळे खेड–भरणे रस्त्यावरील कामांचा वेग वाढवणे, खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती आणि अतिक्रमणावरील कारवाई याबाबत प्रशासन किती गांभीर्याने पावले उचलते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.










