चंद्रपूर येथे १९ जानेवारीला शिक्षकेतर महामंडळाचे राज्य अधिवेशन- रामचंद्र केळकर

रत्नागिरी जिल्ह्यातून कर्मचारी सहभागी होणार

रत्नागिरी : चंद्रपूर येथे महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाचे ५२ वे राज्य अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकेतर बंधू-भगिनी मोठ्या संख्येने अधिवेशनात सहभागी होणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनांचे महामंडळ अंतर्गत हिशेबनीस रामचंद्र केळकर यांनी दिली.

अधिवेशन शहिद बालाजी रायपूरकर सभागृहात (पिंपळनेरी रोड, चिमूर, जि. चंद्रपूर) होणार आहे. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे तसेच अनेक मंत्री उपस्थित राहणार आहे. माध्यमिक शाळेतील शिक्षकेतरांची नवीन भरती सुरू करणे. शिक्षकेतरांसाठी बक्षी समितीने सुचविलेली आश्वासित प्रगती योजना म्हणजे १०-२०-३० लागू करणे. शिक्षकेतरांना पदोन्नतीची संधी देणे, शिक्षकेतर सेवक पदावर अनुकंपा तत्वावर भरती करणे यासह विषयावर चर्चा होणार आहे.

सावंतवाडी येथे जानेवारी २०२४ मध्ये झालेल्या अधिवेशनात तत्कालीन शिक्षणमंत्री माजी दीपक केसरकर यांनी जाहीर केल्याप्रमाणे सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०२४ पासून सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली आहे. राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.

हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी राज्य अध्यक्ष अनिल माने, सचिव शिवाजी खांडेकर, कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकर मेहनत घेत आहेत. या अधिवेशनात रत्नागिरी जिल्हा कार्यवाह अमोल लिंगायत, कार्याध्यक्ष मंगेश सावंत, सहकार्यवाह राजू झगडे, उपाध्यक्ष उमेश दळवी, उपाध्यक्ष चंद्रशेखर लिंगायत, उपाध्यक्ष उमेश पालांडे, खजिनदार संतोष शिंदे, आयव्यय निरीक्षक मनोज लाखण, महामंडळ प्रतिनिधी संजय पाटील हेसुद्धा सहभागी होणार आहेत.