भारतीय ज्ञान परंपरा प्राचीन, आधुनिकही- डॉ. सचिन कठाळे

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कालिदास स्मृति व्याख्यानमालेची सांगता

रत्नागिरी : भारतीय ज्ञान परंपरा प्राचीन, आधुनिक, शास्त्रीय, व्यावहारिक आहे. अंतरंग, सक्ष्म, कोणाच्याही विरोधात नाही, सर्वस्पर्शी, कल्पनातीत, सर्वसमावेशक ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. प्राचीन काळी आयुर्वेद, योग, ज्योतिष, गणित, विज्ञान, कृषि, स्थापत्यशास्त्र, धातुशास्त्र, खगोलशास्त्राचाही सखोल अभ्यास केला होता, त्यामुळे या ज्ञान परंपरेचा अभिमान बाळगा आणि त्यात संशोधनही करा, असे प्रतिपादन बेंगळूर येथील ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सचिन कठाळे यांनी केले.

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातर्फे कालिदास स्मृति व्याख्यानमालेचे द्वितीय व्याख्यान त्यांनी दिले. भारतीय ज्ञान परंपरा यावर त्यांनी उद्बोधक माहिती दिली.

डॉ. कठाळे म्हणाले की, भारतात ३३ प्रकारची विमाने असल्याचा उल्लेख ग्रंथांमध्ये आहे. विमानासाठी लागणाऱ्या वजनाने हलक्या परंतु कोणत्याही स्थितीत भंग न होणाऱ्या धातूची निर्मिती त्या काळी केलेली होती. कृषि ग्रंथांचा आधार घेऊन शेती केली तर ती सर्वांचे कल्याण करणारी ठरेल. लक्ष्मण मंदिरावर आक्रमण झाले. त्यावेळी मंदिराचे नुकसान त्यांना करता आले नाही. ज्यावेळी मूर्ती भंजन केले त्यावेळी सर्व मंदिर क्षणात कोसळले. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा भारतीयांचा अभ्यास होता.

संस्कृत भाषेची स्थिती चांगली आहे, त्याबाबत कोणी चिंता करू नका. अनेक ठिकाणी संस्कृतचे स्वागत केले जाते. बंगळूरमध्ये दरवर्षी संस्कृत शिक्षक पाहिजेत अशा शाळा, महाविद्यालयांच्या जाहिराती येत असतात, असे सांगून डॉ. कठाळे म्हणाले की, युद्धशास्त्र, जलशास्त्र, प्राणीशास्त्र, संमोहनशास्त्र, गंधशास्त्र, रसायनशास्त्र यांच्यावरील ग्रंथही संस्कृतमध्ये आहेत. विविध प्रकारच्या चुंबकांवरील माहिती श्लोकात दिली आहे. द्रावक नावाचा चुंबक आधुनिक वैज्ञानिकांना माहिती नाही.

या वेळी प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, भारतीय ज्ञान परंपरेचा समावेश आता नवीन शिक्षण धोरणात करण्यात आला आहे. अनेकदा आपल्याला परदेशातून ज्ञान मिळाले की त्याचे नवल वाटते. पण संस्कृतमधील भारतीय ज्ञान परंपरेमध्ये शेकडो विषय मांडले गेले आहेत. महाविद्यालय व संस्था नेहमी संस्कृत प्रचार, प्रसारासाठी योगदान देत राहू.

प्रा. प्रज्ञा भट यांनी निवेदन केले. विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी आभार मानले. कविकुलगुरु कालिदास विश्वविद्यालयाच्या डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांच्यासमवेत प्राध्यापक, विविध अभ्यासक, जिज्ञासू रत्नागिरीकर, शिर्के हायस्कूल व जीजीपीएसमधील विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.