रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात इयत्ता तिसरीच्या बालदोस्तांनी छोटे छोटे संकल्प केले. शाळेत संकल्प दिनाच्या दिवशी विद्यार्थ्यांनी हे संकल्प केले. चांगले तेच बोलेन, समाजातील दिव्यांग, गरजूंना साह्य करीन, निसर्गाचे संवर्धन असे अनेक संकल्प केले.
याप्रसंगी विक्रोळी येथील विकास हायस्कूल, ज्युनिअर कॉलेजच्या प्र. माजी मुख्याध्यापिका सौ. वर्षा जाधव आचार्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी सांगितले की, आगाशे विद्यामंदिरात संस्कारित व सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे. संकल्प दिन ही खूपच सुरेख संकल्पना आहे. या विद्यार्थ्यांना वळण, शिस्त लागणार आहे, असे प्रतिपादन केले.
भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे विद्यामंदिरात आयोजित संकल्प दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता कदम यांनी त्यांचे स्वागत केले. परिचय सौ. गीता सावंत यांनी करून दिला. प्रबंधक विनायक हातखंबकर यांनी सौ. जाधव यांचा सत्कार केला. विद्यार्थ्यांनी शारदास्तवन, अठरा श्लोकी गीता, संकल्प गीत सुरेल आवाजात म्हटले. सौ. जाधव यांनी सूर्यमंत्र व समूहमंत्र उच्चारण करून घेतले. तसेच संकल्पांचे उच्चारण सौ. देवरुखकर यांनी विद्यार्थ्यांकडून करून घेतले.
विद्यार्थ्यांनी अनेक संकल्प केले. यात रोज सकाळी लवकर उठून मुखमार्जनानंतर देवाला, वडिलधाऱ्यांना नमस्कार करीन, सूर्यमंत्राचे स्मरण करीन, समंत्र सूर्यनमस्कार घालीन, अभ्यास मन लावून करीन, पानात वाढलेले सर्व पदार्थ आवडीने खाईन, चांगले तेच बोलेन, समाजातील दीन-दुबळे, दिव्यांग, गरजूंना साह्य करीन, सभोवतालच्या वृक्ष, वेलींचे संवर्धन करीन या संकल्पांचा समावेश होता. मंजिरी गुणे यांनी सूत्रसंचालन केले. श्री. राठोड यांनी आभार मानले. दुसऱ्या सत्रात सौ. जाधव पालकांशी हितगुज करून पाल्यांसोबत कसे वागावे, परिश्रम, कष्टाचे महत्त्व, कौशल्य यासंबंधी विस्तृत मार्गदर्शन केले











