रत्नागिरी : येथील कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात लोकमान्य टिळकांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या निमित्त पहिली ते चौथीच्या एकूण बारा वर्गांमध्ये बालसभेचे आयोजन करून त्या अंतर्गत वक्तृत्व व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. प्रत्येक वर्गात मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले.
पुण्यतिथीनिमित्त टिळकांच्या प्रतिमेला मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता कदम यांनी पुष्पहार अर्पण केला. या वेळी सर्व शिक्षिका-शिक्षक उपस्थित होते. ओम राम कृष्ण हरी जप, त्यानंतर लोकमान्य टिळकांचे पद्य सादर करण्यात आले. वर्गावर्गात निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. प्रत्येक वर्गात लोकमान्य टिळकांच्या वेशभूषेत एकेक विद्यार्थी आले होते. बालसभेचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले.
इयत्ता पहिलीच्या वर्गात सौ. शलाका रेडिज, सौ. सुरेखा दाते, सौ. भक्ती वणजू, इयत्ता दुसरीच्या वर्गात यश सोवनी, मयुरेश पाटील, सौ. कविता मुळ्ये, इयत्ता तिसरीच्या वर्गात स्वप्नगंधा नाईक, सौ. तनया दळवी, सौ. अपर्णा गोगटे, इयत्ता चौथीच्या वर्गात सौ. आभा घाणेकर, प्रमोदिनी शेट्ये व सौ. पूनम हट्टीकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात आले.
रत्नागिरी नगरपालिकेच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त शाळा पातळीवर आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत आगाशे विद्यामंदिरच्या सहा विद्यार्थ्यांनी सुयश मिळवले. यामध्ये इयत्ता पहिली व दुसरीच्या गटात सारजा प्रविण सुतार (प्रथम), अनुष्का नीलेश नानिवडेकर (द्वितीय) आणि स्वानंद सिद्धेश देशमुख (तृतीय), इयत्ता तिसरी व चौथीच्या गटात ज्ञानेश शैलेश काळे (प्रथम), स्वरा सूरज शेट्ये (द्वितीय) आणि सार्थक संदीप ढवळ (तृतीय) यांनी यश मिळवले. विजेत्यांचे अभिनंदन मुख्याध्यापिका सौ. कदम व सर्व शिक्षक, शिक्षकांनी केले.









