अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात सांस्कृतिक मंडळाचे उद्घाटन

रत्नागिरी – रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात सांस्कृतिक मंडळाचे उद्घाटन व देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन मंगळवार, दि. १२ ऑगस्ट रोजी करण्यात आले.

या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर व सांस्कृतिक मंडळ प्रमुख प्रा. सीमा फळणीकर उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते मंडळाचे उद्घाटन झाले. मार्गदर्शन करताना प्रा. गोसावी म्हणाले, “आनंदासाठी छंद आणि करिअर या दोघांची सांगड घालणे आवश्यक आहे. सांस्कृतिक मंडळ हे विद्यार्थी घडवणारे केंद्र असून विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांत अधिकाधिक सहभाग नोंदवावा.”

उद्घाटनानंतर झालेल्या देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला. प्रा. भूषण केळकर व प्रा. कश्मीरा सावंत यांनी परीक्षण केले. तर गोगटे-जोगळेकर स्वायत्त महाविद्यालयाच्या परफॉर्मिंग आर्ट्स विभागातील विद्यार्थ्यांनी प्रा. हरीश केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत साथ केली.

या स्पर्धेत स्वराधीश ग्रुपने “रक्षीण्यास चालले जवान माय भूमीचे” या गीताने प्रथम क्रमांक पटकावला. स्वातंत्र्य स्वर ग्रुपचे “जयोस्तुते जयोस्तुते” या गीताला द्वितीय तर जयतू भारत ग्रुपचे “जयतु भारतम्” या गीताला तृतीय क्रमांक मिळाला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सीमा फळणीकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. हृषीकेश नागवेकर यांनी केले. परीक्षकांचा परिचय प्रा. प्रिती टिकेकर यांनी करून दिला तर आभार प्रा. माधवी लेले यांनी मानले.