सावंतवाडी, – कोलगाव आयटीआय परिसरातील कांजरकोड ओहाळात मगरींची वाढलेली हालचाल स्थानिकांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. रविवारी सकाळी काही नागरिकांना ओहाळाच्या काठावर मोठी मगर ऊन खाताना दिसली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नदी-ओहाळाजवळ रोज जनावर, कपडे धुवायला तसेच शेतातील कामानिमित्त ग्रामस्थ ये-जा करतात. मगरींची वाढती उपस्थिती लक्षात घेता अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी वनविभागाने तातडीने तपासणी करून योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले की, अलीकडेच पावसामुळे ओहाळातील पाण्याचा प्रवाह वाढला असून जंगली प्राण्यांची वावर वाढल्याची शक्यता आहे. वनविभागाने तत्काळ पिंजरा लावून मगर पकडावी, तसेच परिसरात इशारा फलक लावून नागरिकांना सावधानतेचा इशारा द्यावा, अशीही मागणी होत आहे.












