मनसेचे सा.बां. उपविभाग गुहागरला निवेदन
गुहागर | प्रतिनिधी :
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी–जानवळे फाटा मार्गे गावात जाणारा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा झाला असून त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. पादचाऱ्यांना चालणे अवघड झाले आहे, तर दुचाकीस्वारांसाठी हा रस्ता अक्षरशः जीवघेणा ठरत आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे काही दिवसांपूर्वी एस.टी. बस उलटण्याची घटना घडली होती. सुदैवाने मोठा अनर्थ टळला, मात्र भविष्यात गंभीर अपघात घडू शकतो, असा इशारा देत या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रत्नागिरी उपजिल्हाध्यक्ष श्री विनोद गणेश जानवळकर यांनी केली आहे.
या संदर्भात त्यांनी नुकतेच सार्वजनिक बांधकाम उपविभाग, गुहागर यांना निवेदन सादर केले. निवेदनात त्यांनी स्पष्ट केले आहे की, जर रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्यात आली नाही तर मनसेच्या वतीने जानवळे रस्त्यावर ग्रामस्थांना घेऊन आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी याशिवाय, रस्त्यावरील दुर्लक्षामुळे अपघात घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम उपविभाग, गुहागर यांच्यावर राहील, असा ठाम इशारा देखील निवेदनातून देण्यात आला आहे.
रस्त्याचे तात्काळ दुरुस्ती व दर्जेदार दुरुस्ती करून जनतेला दिलासा ही आपली कायदेशीर व नैतिक जबाबदारी आहे सबब पत्रास अनुसरून 20 तारखेपर्यंत आपण योग्य ती आवश्यक कार्यवाही करून रस्ता दुरुस्त न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आक्रमक भूमिका धारण करावी लागेल जानवळे गावातील सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अतिरिक्त असलेल्या रस्त्यावर आंदोलन करण्यात येईल पुढील होणाऱ्या परिणामास सर्वस्व जबाबदार आपणच राहाल याचीही नोंद घ्यावी असा इशाराही देण्यात आला आहे.











