रानकुत्र्यांच्या कळपामुळे शेतकऱ्यांमध्येही दहशत
सावंतवाडी । प्रतिनिधी : मळगाव कुंभारवाडी भूतनाथ मंदिर लगत असलेल्या भातशेतीत चरण्यासाठी आलेल्या सांबरावर जंगलातून आलेल्या रानकुत्र्यांनी हल्ला केला. लगतच असलेल्या शेतकऱ्यांनी आरडाओरडा करत सांबराची रानकुत्र्यांच्या हल्ल्यातून मुक्तता केली. मात्र, या हल्ल्यात सदरचे सांबर जखमी झाले.
मळगाव कुंभारवाडी हा भाग जंगल परिसरालगत आहे. सद्यस्थितीत या भागात दहा ते बारा रानकुत्र्यांचा कळप मोकाट फिरत आहे. चारावयास घेऊन गेलेल्या गुरांवरही हे कुत्रे हल्ला करीत असल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. हे जंगली कुत्रे अतिशय धोकादायक असल्याने गुरांना त्यांच्यापासून भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे या रानकुत्र्यांचा वनविभागाने त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.












