रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे भुस्खलन होऊन काजरघाटी पिलणकर वाडीतील 4 घरांना धोका

तात्काळ पंचनामे करून संरक्षक भिंत बांधण्यासाठी भाजप तालुका अध्यक्ष दादा दळी यांनी केली मागणी

रत्नागिरी | प्रतिनिधी : या महिन्याच्या सुरुवातीला  1 ऑक्टोबर 2023 रोजी पडलेल्या अतिमुसळधार पावसाने काजरघाटी पिलणकरवाडी येथे भुस्खलन झाल्याने कोमल पिलणकर, विजय पिलणकर, सचिन पिलणकर, राकेश पिलणकर, या लोकांच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. याबाबत जिल्हाधिकारी व तहसीलदार म्हात्रे यांना भाजप तालुका अध्यक्ष दादा दळी यांनी निवेदन देऊन तात्काळ महसूल खात्याने पंचनामा करून कोणतीही जीवित वा वित्त हानी होऊ नये म्हणून संरक्षक भिंत बांधण्यात यावी अशी विनंती केली.

यावेळी भाजप चे जिल्हाअध्यक्ष राजेश सावंत यांनी तहसीलदार म्हात्रे यांना आपण स्वतः लक्ष घालावे व उपाय योजना करावी अशी मागणी केली. यावेळी जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत डिंगणकर, तालुका उपाध्यक्ष दिलीप पटवर्धन, सरचिटणीस सुशांत पाटकर, जिल्हा किसान आघाडीचे ज्ञानेश पोतकार, अशोक वाडेकर, किसान आघाडीचे तालुका अध्यक्ष जगन्नाथ पवार, बाधित पिलणकर वाडीतील ग्रामस्थ व भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.