रत्नागिरी : रत्नागिरीत प्रथमच गीता जयंतीनिमित्त सहा संस्थांनी एकत्र येत संपूर्ण श्रीमद्भगवद्गीता पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी म्हणजे शुक्रवार दि. २२ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत जयस्तंभ येथील गीता भवन येथे हा कार्यक्रम होणार आहे.
श्रीमद्भवगवद्गीता म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून आलेले अमृतच. मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध एकादशीला भगवंताने हे गीतामृत अर्जुनाला सांगितले असे आपली परंपरा मानते. म्हणून मार्गशीर्ष शुद्ध एकादशीच्या दिवशी गीताजयंती साजरी करण्याची पद्धत आहे. या वर्षी रत्नागिरीतील विविध संस्थांनी एकत्र येऊन संपूर्ण श्रीमद्भगवद्गीता पारायणाचे आयोजन केले आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सौ. अंजली बर्वे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे नियोजन गीता मंडळ, नारायणी पठण मंडळ, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, स्वानंद पठण मंडळ, कवीकुलगुरु कालिदास विश्वविद्यालय रत्नागिरी उपकेंद्र, संस्कृत भारती यांनी केले आहे. हा कार्यक्रम गीता भवन येथे सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत गीता भवन येथे होणार आहे. यात जास्तीत जास्त गीताप्रेमी, संस्कृतप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.












