कारवाई न झाल्यास २६ जानेवारी पासून आमरण उपोषणाचा ईशारा
प्रांताधिकारी व तहसीलदारांना निवेदन
राजापूर l प्रतिनिधी : राजापूर शहरालगतच्या धोपेश्वर ग्रामपंचायत हद्दीतील पन्हळे तर्फे राजापूर गावामध्ये सुरू असलेला अनधिकृत मदरसा बंद करावा असा ठराव ग्रामसभेमध्ये बहुमताने पारित झालेला असतानाही दोन महिने उलटले तरी अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ संतप्त झाले असून सदरचा अनधिकृत मदरसा तात्काळ बंद न झाल्यास २६ जानेवारी पासून आमरण उपोषण छेडण्याचा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.
याबाबतचे एक लेखी निवेदन ग्रामस्थांनी धोपेश्वर ग्रामपंचायतीला दिले असून राजापूर प्रांताधिकारी व तहसीलदार यांनाही लेखी निवेदन देणार असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली.
धोपेश्वर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये पन्हळे तर्फे राजापूर येथे एका शेतघरामध्ये ग्रामपंचायत अथवा शासनाची कोणतीही परवानगी न घेता मदरसा सुरू करण्यात आला आहे. या मदरशामध्ये परराज्यातील मुले राहत असून त्यांचा गावात राजरोसपणे वावर सुरू झाल्याने ग्रामस्थांनी याबाबत ग्रामपंचायतीकडे तक्रार केली होती. त्यानुसार दिनांक ७ नोव्हेंबर २०२३ रोजीच्या ग्रामसभेमध्ये या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी या मदरशाला तीव्र विरोध दर्शवित विनापरवाना सुरू असलेला मदरसा बंद करण्याचा ठराव बहुमताने मंजूर केला होता.
मदरशाला ग्रामस्थांचा विरोध असतानाही ग्रामपंचायतीने संबधित शेतघर मालकाला १५ दिवसांमध्ये कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आदेश दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत संबंधितांनी कोणतीही कागदपत्रे सादर केलेली नसताना अद्यापही ग्रामपंचायतीने सदरच्या अनधिकृत मदरशावर कोणतीही कारवाई केलेली नाही. राजापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गावामध्ये परराज्यातील तरूण मुले वास्तव्याला आहेत. त्यांची भाषाही वेगळी आहे, ही मुले नेमकी परराज्यातील आहेत की अन्य कुठली आहेत, याबाबतही ग्रामस्थ अनभिज्ञ आहेत. अशा स्थितीत प्रशासनाकडूनही कोणतीच कार्यवाही होताना दिसत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. याबाबत पोलीस प्रशासनालाही माहिती देण्यात आली असतानाही पोलीसांनी याची गांभीर्याने दखल घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या मदरशामध्ये राहणाऱ्या मुलांचा गावामध्ये स्वैरपणे वावर असल्याने गावातील माता भगिनींना बाहेर फिरणे मुश्किल बनले आहे. गावामध्येही काहीसे भितीचे वातावरण असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. असे असताना व ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये या मदरशाला विरोध दर्शविलेला असताना कारवाई करण्यास ग्रामपंचायत व प्रशासन टाळाटाळ करत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून याबाबत तात्काळ कार्यवाही न झाल्यास २६ जानेवारी पासून आमरण उपोषण छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.









