महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत वैभव नायकांनी केलेले ‘अर्थ’कारण पुराव्यानिशी उघड करू

भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचा इशारा ; दीड कोटीची संपत्ती दीडशे कोटींवर कशी गेली , याचे उत्तर नाईकांनी जनतेला दयावे 

मालवण | प्रतिनिधी : कुडाळ मालवण मतदार संघातील ३० कामाना टक्केवारीच्या राजकारणातून वर्क ऑर्डर न मिळाल्याचा आरोप करणाऱ्या आमदार वैभव नाईकांवर भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी हल्लाबोल केला आहे. चिंदर, त्रिंबक, वायंगणी हिर्लेवाडी, आचरा डोंगरेवाडीतील कामे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत केली गेली. त्यावेळी सत्तेचा वापर करून आमदार वैभव नाईकांनी किती अर्थकारण केले, ते पुराव्यानिशी उघड करु, असा रोखठोक इशारा धोंडी चिंदरकर यांनी दिला आहे.

एसीबीच्या रडारवर असलेल्या वैभव नाईकांनी आपली संपत्ती दीड कोटी वरुन दीडशे कोटींवर कशी नेली याची महिती जनतेला द्यावी. कुठला उद्योग त्यांनी केला आणि दीडशे कोटी कमवले ? आणि तसा उद्योग असेल तर गरीब बिचाऱ्या शिवसैनिकांना पण तशा उद्योगात उतरवावे. प्रश्न काही कामांच्या वर्क ऑर्डरचा तर त्या लवकरच होणार आहेत. कामे मंजूर झाल्याचं समजल की लगेच आपला स्टिकर कसा लावायचा येवढं वैभव नाईक यांना करता येतं. कुठलही काम मंजूर झालं की आपल्या कार्यकर्त्याना पत्र पाठवून ते गावभर वाटून आपणच काम केलं अशी टिमकी मिरवायची हा एककलमीच कार्यक्रम वैभव नाईक यांच्या हातात आहे. सत्ता असताना जी कामे करता आली नाही ती सत्ता नसताना कशी करणार ? पाणबुडी प्रकल्प तूम्ही सत्तेत असताना का सुरु करु शकला नाहीत ते आधी जनतेला सांगावं. लवकरच तुमचे मालवण मधील शिवसैनिक काही शिंदे गटात तर काही भाजप मध्ये प्रवेशकर्ते होत आहेत. तूम्ही जर पक्ष संघटना आणि विकासात्मक कामे केली म्हणता तर कुडाळ मालवण मधुन तुमचे शिवसैनिक तुम्हाला का सोडून जात आहेत याचं आत्मपरीक्षण करावं, असा सल्ला धोंडू चिंदरकर यांनी दिला आहे.