रत्नागिरी : सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि पोलिस रेझिंग सप्ताहानिमित्त दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग येथे विद्यार्थिनींना सायबर गुन्हेविषयक काळजी घेण्यासंदर्भात सायबर पोलिस ठाण्यामार्फत मार्गदर्शन करण्यात आले. सायबर क्राईमच्या पोलिस अमलदार निशा केळकर आणि श्रिया साळवी यांनी बहुमोल मार्गदर्शन केले.
या दोघींचा सत्कार कॉलेजच्या रजिस्ट्रार शलाका यांनी केला. याप्रसंगी प्र. प्राचार्य प्रा. रमेश बंडगर, सर्व शिक्षक, विद्यार्थिनी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अपेक्षा राऊत यांनी केले.
निशा केळकर यांनी सांगितले की, २००८ मध्ये महाराष्ट्रात आयटी ॲक्ट आला. पुण्यात एका लिंकद्वारे ड्रग पार्टी बोलावण्यात आली. त्यामुळे तिथे पहिला सायबर क्राईमचा गुन्हा दाखल झाला. गेल्या काही महिन्यांमध्ये ऑनलाइन ॲपद्वारे अनेकांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी येत आहेत. वेबसाईट हॅक, पबजी गेम हॅक झाल्याच्या तक्रारीसुद्धा आमच्याकडे आल्या आहेत. लोन ॲप, महावितरणचे बिल भरले नाही म्हणून येणारा मेसेज त्याद्वारे होणारी फसवणूक यासंदर्भात मार्गदर्शन केले. बिल भरा नाहीतर तुमची वीज खंडित केली जाणार असल्याच्या मेसेजवर क्लिक करून प्रतिसाद दिल्यामुळे लाखो रुपयांची फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आपण अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या लिंक ओपन केल्यास त्यातून मोबाईल हॅक करून फसवणूक होण्याची भिती असते.
अनेकदा मॉर्फिंगसारखे प्रकारही घडत आहे. असे प्रकार आपल्यासोबत घडू नये याकरिता विद्यार्थ्यांनी दक्ष राहिले पाहिजे. रत्नागिरीसारख्या ठिकाणी ऑनलाइन अमली पदार्थ शोधले जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. विद्यार्थ्यांनी चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत. सायबर क्राईम गुन्ह्यात आरोपींना जामीन मिळत नाही. नोकरी देणाऱ्या वेबसाईट्सवरूनही फसवणूक होते. सायबर पोलीस पोर्टल आणि हेल्पलाईन नं. 1930 वर फोन करण्यासंदर्भातील माहितीसुद्धा निशा केळकर यांनी केली.
यानंतर श्रिया साळवी यांनी सोशल मीडिया म्हणजे फेसबुक, इन्स्टा ॲप वापरण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. आपल्या खात्याचा पासवर्ड कोणालाही कळू नये आणि तो दर महिन्याला बदलावा. व्हॉटसअप, फेसबुक किंवा इन्स्टा या ॲपला २ स्टेप व्हेरिफिकेशन करून घेतल्यास हॅकर्स आपले खाते हॅक करू शकत नाही. अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट घेऊ नये, तसेच आपली गोपनीयता राखण्यासाठी ॲपचे तसे सेटिंग करण्याबाबत साळवी यांनी माहिती दिली.











