Maharashtra Weather News : ‘या’ वेळेत घराबाहेर पडूच नका; कोकणासह मुंबईत उष्णतेच्या लाटेमुळं इशारा

Maharashtra Weather News : हवामान विभागानं यंदाच्या वर्षी मान्सून सामान्यहून अधिक बरसणार असल्याचा इशारा देत अनेकांनाच दिलासा दिला. असं असलं तरीही मान्सूनच्या आगमनास अद्यापही अनेक दिवस शिल्लक आहेत.

हे दिवस उन्हाळ्याचे असल्यामुळं हा उन्हाळा ओलांडूनच मान्सून अनुभवता येणार आहे. दरम्यान, पुढील 24 तासांसाठी मुंबई आणि कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबईसह कोकणात (Konkan) उन्हाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर कोकणातील एकाकी भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्यामुळं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Mumbai) मुंबई, ठाण्यासह (Thane) रायगड जिल्ह्यात आज उष्णतेची लाट येणार असून इथं तापमान 40 अंशाच्या पुढे जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्यामुळं दुपारी 12 ते 3 या दरम्यान नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागानं केलं आहे.

विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असून, नाशिक, नगर, पुणे, सातारा या भागांमध्ये वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर, धाराशिवमध्ये वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्याच्या दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस 30-40 किमी प्रतितास वेगानं येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.