रत्नागिरी ः प्रतिनिधी
रत्नागिरीकरांना करोडोंचा चुना लावणार्या आर्जु टेक्सोल कंपनीची फसवणुकीची व्याप्ती दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आता पर्यंत या कंपनीविरोधात शुक्रवारपर्यंत 175 जणांचे जबाब नोंदवण्यात आले असून फसवणूकीची रक्कम 2 कोटीपर्यंत गेली आहे. कंपनीची फसवणुकीची व्याप्ती मोठी असून अन्य आरोपींच्या शोधासाठी दिल्ली,पूण्यात गेलेली पथके अजून परतलेली नसून अन्य संशयितांचा कसून शोध घेतला जात आहे.
यापूर्वी तपासाची चक्रे वेगाने फिरवून कंपनीच्या चार संचालकांपैकी संजय केळकर आणि प्रसाद फडके या दोघांना आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली होती. तर अन्य दोन संचालक अद्याप फरार आहेत. दरम्यान, या दोन संशयितांच्या पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांच्या पोलिस कोठडीत 3 जून पर्यंत वाढ करण्यात आली आहे. तक्रारी दाखल झाल्यानंतर पोलिसांसमोर नेहमीच नवनवीन माहिती उघडकीस येत असल्याने पोलीसही अचंबित झाले आहेत.
या कंपनीच्या वेगवेगळ्या स्किममध्ये रत्नागिरी बरोबरच सिंधुदुर्गातील कुडाळ,सांगली,मिरज,पूणे येथील नागरिकांनीही मोठी गुंतवणूक केली आहे. पोलिसांनी आवाहन केल्यानंतर आता दिवसेंदिवस तक्रारदारांची संख्या वाढत असून आतापर्यंत 175 जणांचा जबाब पोलिसांकडून नोंदवण्यात आला आहे. दोन संचालकांच्या मुसक्या आवळल्यानंतर पोलिसांनी आता अन्य दोन संचालकांना अटक करण्यासाठी ठिकठिकाणी आपली पथके रवाना केली आहेत.











