भात लावणीस आलेल्या रोपांची मोठ्याप्रमाणावर नासधूस
शिरगाव ( प्रतिनिधी) देवगड तालुक्यातील साळशी- सरमळेवाडी येथे शेती करीत असलेले शेतकरी शांताराम रावले,वैभव घाडी,मनोज नाईक यांची लावणीस आलेली योग्य भातरोपे ( तरवा) गवारेड्याने खावून , पायदळी तुडवून टाकली व नासधूस केली.त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
हे गवारेडे कळपाने फिरत असून सध्या काजू- आंबा हंगाम संपला असल्यामुळे ते शेतीकडे वळले आहेत. सरमळेवाडी येथील शेतातील भातलावणीस आलेली योग्य भातरोपे ( तरवा) गुरुवारी रात्रीच्या वेळेस गवारेड्यानी हि भातरोपे खाऊन फस्त केली.तसेच या शेतीत उलट- सुलट फिरुन भातरोपे पायदळी तुडवून भातपिकाची मोठ्याप्रमाणावर नासधूस केली. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.
या वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रव्यामुळे अनेक शेतक-यांनी शेती करावयाची सोडली आहे.
दरम्यान नुकसान झालेल्या शेतीची वनरक्षक निलेश साठे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा केला.
तरी या वन्यप्राणांचा बंदोबस्त करावा अशी शेतक-यांतून मागणी होत आहे.












