शेती बागायती हे शाश्वत रोजगाराचे साधन : व्ही एम नाईक

सावंतवाडी पंचायत समिती व भालावल ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळावा

सावंतवाडी । प्रतिनिधी : शेती बागायती हे शाश्वत रोजगाराचे एकमेव साधन आहे. यासाठी शेतकऱ्यांनी शेतीचे प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करून आधुनिक यंत्रसामग्रीसह त्याला कष्टाची जोड दिल्यास आर्थिक उन्नती निश्चित आहे. तसेच शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून उत्पादकता वाढवून शेतीपूरक व्यवसाय केल्यास आपला सर्वांगीण विकास शक्य आहे, असे प्रतिपादन सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक यांनी केले.

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या १११ जयंतीच्या कृषी दिनानिमित्त सावंतवाडी पंचायत समिती आणि भालावल ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी भालावल येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना व्ही एम नाईक बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राचे कीटक शास्त्रज्ञ अजय मुंज, उपविभागीय कृषी अधिकारी पोपटराव पाटील, सहाय्यक गट विकास अधिकारी मंगेश जाधव, सावंतवाडी तालुका सावंतवाडी तालुका कृषि अधिकारी युवराज भुईंबर, भालावल सरपंच समीर परब, उपसरपंच अर्जुन परब, ग्रामसेवक तृप्ति राणे , ग्रामपंचायत सदस्य रविंद्र परब, ओटवणे सरपंच दाजी गावकर, विलवडे सरपंच प्रकाश दळवी, सरमळे सरपंच विजय गावडे, तांबोळी सरपंचा सौ नाईक, चराठा सरपंचा प्रचिती कुबल, मंडळ कृषी अधिकारी राजाराम शिंदे, तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आणि भालावल परिसरातील शेतकरी, बागायतदार ,ग्रामपचायत कर्मचारि ,महिला बचतगत ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भालावल प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी काढलेली वृक्षदिंडी तसेच भालावल गावातील धनगर समाज बांधवांनी सादर केलेले चपई नृत्य लक्षवेधी ठरले. यावेळी पोपटराव पाटील यांनी अजय मुंज, प्रमोद दळवी, शिवप्रसाद देसाई बहुमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सावंतवाडी पंचायत समितीचे कृषि अधिकारी प्रशांत चव्हाण यांनी केले.